विजेच्या लपंडावामुळे नायगावचे ग्रामस्थ त्रस्त
By admin | Published: July 9, 2015 02:02 AM2015-07-09T02:02:29+5:302015-07-09T02:02:29+5:30
पूर्व पुरंदरमधील नायगावच्या गावठाणातील ग्रामस्थ गेल्या तीन महिन्यांपासून विजेच्या लपंडावामुळे त्रस्त झाले आहेत.
सासवड : पूर्व पुरंदरमधील नायगावच्या गावठाणातील ग्रामस्थ गेल्या तीन महिन्यांपासून विजेच्या लपंडावामुळे त्रस्त झाले आहेत. आर्थिंगचे साहित्य नाही, या कारणाखाली तीन महिन्यांपासून विद्युत विभागाच्या बारामती येथील ठेकेदाराने मंजूर झालेल्या रोहित्राचे काम अर्धवट ठेवले असल्याने ग्रामस्थ आता संतापले आहेत. दोन दिवसांत काम पूर्ण न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा बेलसर-माळशिरस गटाचे शिवसेनेचे विभाग प्रमुख किशोर खळदकर यांनी दिला आहे.
नायगावच्या गावठाणासाठी एसटी स्थानकाजवळ रोहित्र आहे. मात्र, या रोहित्रावर जास्त दाब येत असल्याने वारंवार फ्युज जाण्याचे प्रकार होतात. येथील सिंगल फ्युजचे डबे खराब आहेत. त्यामुळे फ्युज टिकत नाहीत व प्रत्येकवेळी गावातील युवक रात्रीच्या वेळीही जीव धोक्यात घालून फ्युज व डीओ टाकणे अशी कामे करतात. मात्र, जास्त दाबामुळे फ्युज जातात. यासाठी पर्याय व या रोहित्रावरील जादा दाब कमी होण्यासाठी गावठाणातच दुसरे रोहित्र मंजूर केले आहे. बारामती येथील एका ठेकेदाराकडे रोहित्राचे काम देण्यात आले आहे. (वार्ताहर)