ईडीने कारवाई केलेल्या नेत्यांमध्ये एकही भाजप नेता नाही; शरद पवारांचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2024 14:51 IST2024-02-11T14:50:16+5:302024-02-11T14:51:48+5:30
आज खासदार शरद पवारांनी भाजपवर टीका केली.

ईडीने कारवाई केलेल्या नेत्यांमध्ये एकही भाजप नेता नाही; शरद पवारांचा हल्लाबोल
Sharad Pawar ( Marathi News ) : भाजपकडून देशात सत्तेचा दुरुपयोग सुरू आहे. विरोधी पक्षातील नेत्यांवर ईडीची कारवाई सुरू आहे. देशात भाजप सत्तेवर आल्यानंतर गेल्या आठ वर्षात १२१ नेत्यांवर ईडीने कारवाई केली. ईडीचा गैरवापर सुरू आहे. २००५ ते २०२३ या सतरा वर्षाच्या काळात ईडीच्या केसेस ६ हजार रजिस्टर झाल्या. आतापर्यंत यातील २५ केसेस निकालात निघाल्या आहेत, यातल्या फक्त दोघांनाच शिक्षा झाल्या आहेत. ईडी तपास यंत्रणेने ८५ टक्के विरोधी पक्षातील नेत्यांची चौकशी केली. ईडीने कारवाई केलेल्या नेत्यांमध्ये एकाही भारतीय जनता पार्टीच्या नेत्याचे नाव नाही, असा आरोप आज खासदार शरद पवार यांनी केला.
Farmers Protest : इंटरनेट बंद, कलम 144 लागू; शेतकऱ्यांच्या आंदोलनापूर्वी 'या' गोष्टींवर घातली बंदी!
"या अधिकाराचा वापर लोकशाहीत विरोधात कोण बोलतात त्यांच्या विरोधात केला जातो. भाजप सत्तेत आल्यानंतर आठ वर्षात १२१ नेत्यांवर कारवाई केली. यात एक मुख्यमंत्री, एक माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्षांचे सरकार असणाऱ्या राज्यातील १६ मंत्री, २४ खासदार, २१ आमदार, ७ माजी खासदार यांचा समावेश आहे. याचा अर्थ काय काढायचा?, असा सवालही पवार यांनी केला.
आज आपण वेगळ्या स्थितीतून जात आहोत. देशातील सत्ता एका पक्षाच्या हातात आहे, या आधी लोकांनी ईडी हा शब्दही माहित नव्हता, पण आता ईडी हा शब्द देशाच्या काणाकोपऱ्यापर्यंत पोहोचला आहे. भाजपच्या विरोधात कोण भूमिका घेत असेल तर लगेच त्याच्या मागे ईडी लावली जाते, असंही पवार म्हणाले.
"निवडणूक आयोगाचा निर्णय आश्चर्यकारक"
आम्ही आयोगाकडे चिन्हाची मागणी केलेली नाही, ते आम्हाला सोमवारी किंवा मंगळवारी चर्चेला वेळ देऊ शकतात. निवडणूक आयोगाचा निकाल आश्चर्यकारक आहे, असंही पवार म्हणाले. मी निवडणुकीला उभा राहणार नाही, बारामतीची जनता समजदार आहेत. त्यांची प्रतिष्टा कोणी वाढवली हे पाहून ते योग्य निर्णय घेतील, असंही शरद पवार म्हणाले.