महामारीच्या काळात यावर्षीही पालखी सोहळा न व्हावा.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:11 AM2021-05-27T04:11:47+5:302021-05-27T04:11:47+5:30
आषाढी वारीतील पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होऊन एक वेगळा आत्मिक समाधानाचा अनुभव घेण्याची वैष्णवांची मानसिकता असते. मनुष्य जातीत जन्माला आल्यानंतर ...
आषाढी वारीतील पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होऊन एक वेगळा आत्मिक समाधानाचा अनुभव घेण्याची वैष्णवांची मानसिकता असते. मनुष्य जातीत जन्माला आल्यानंतर एकदा तरी पालखी सोहळ्यात पायी सहभागी होऊन पालखी सोहळ्याचा अनुभव घ्यावाच, अशा प्रकारची प्रतिक्रिया उरुळी कांचन येथून पंचक्रोशी प्रासादिक दिंडीचे माध्यमातून सुमारे ४०० ते ५०० भाविकांना या सोहळ्यामध्ये सहभागी करून घेऊन पंढरपूरच्या विठ्ठलाचे दर्शन घडविण्याचा प्रयत्न करणारे हभप सुरेश कांचन यांनी व्यक्त केली.
पालखी सोहळ्यासारखा आनंदाचा क्षण दुसरा कोणताही नसताना कोरोना महामारीने पछाडलेल्या मानव जातीला या सोहळ्यापासून लांब राहणे नाईलाजाने मान्य करावे लागते आहे, याची खंत मनामध्ये आहेच परंतु नाईलाजाने ही गोष्ट मान्य करून सरकारला यामध्ये सहकार्य करण्याची भूमिका सर्वांना घेणे क्रमप्राप्त आहे, अशी भावना उरुळी कांचन येथील श्री काळभैरवनाथ प्रासादिक दिंडीचे प्रमुख हभप तुकाराम नबाजी कांचन यांनी व्यक्त केली.
पंढरपूरच्या विठ्ठलाच्या भेटीची मनातील इच्छा पालखी सोहळ्याच्या माध्यमातून पूर्ण होत असते. परंतु मागील वर्षापासून या आनंदावर कोरोना महामारीने संकट निर्माण केले असतानाही काहीतरी चांगले होण्यासाठी त्रास सहन करून विठ्ठलाच्या भेटीची आसक्ती दूर ठेवून सरकारला सहकार्य करण्याची भूमिका वैष्णवांनी घेतलेली आहे. कोरोना महामारीची भीती मनामध्ये आहेच, नाईलाज आहे दुसरा कोणताही पर्याय नाही, अशी भावना उरुळी कांचन येथील चिंतामणी प्रासादिक दिंडीचे प्रमुख हभप संभाजी तुपे यांनी व्यक्त केली.
एकूणच पालखी सोहळ्यासारखा आनंद दुसरा कोणताच नाही परंतु या महामारीच्या काळात तो स्थगित ठेवणे हेच योग्य आहे, अशी भावना अनेकांनी बोलून दाखवली.