पालिकेला नकोय शहरात ‘शांतता’
By admin | Published: July 8, 2015 02:53 AM2015-07-08T02:53:36+5:302015-07-08T02:53:36+5:30
शहरांमधील ध्वनिप्रदूषणांबाबत केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने ध्वनिप्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम २००० ची सर्व नागरी क्षेत्रांमध्ये अंमलबजावणी करण्याचे आदेश दिलेले आहेत.
शहरांमधील ध्वनिप्रदूषणांबाबत केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने ध्वनिप्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम २००० ची सर्व नागरी क्षेत्रांमध्ये अंमलबजावणी करण्याचे आदेश दिलेले आहेत. या नियमांकडे दुर्लक्ष केले जात असल्याने डॉ. महेश बेडेकर यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. या याचिकेवर निकाल देताना, न्यायालयाने ध्वनिप्रदूषण नियमांची अंमलबजावणी तातडीने करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशानुसार, राज्य शासनानेही अधिसूचना काढून त्यानुसार, महापालिका क्षेत्रात ध्वनिप्रदूषणाबाबत तक्रार निवारण कार्यप्रणाली तत्काळ उभारण्यात यावी, त्यास व्यापक प्रसिद्धी दिली जावी, तसेच शहरातील ध्वनिप्रदूषणाची पातळी मोजण्यासाठी पुरेसे मशिन आणि उपकरणे उपलब्ध करून द्यावीत, याशिवाय या ध्वनिप्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियमांची अंमलबजावणी व्हावी असे यात नमूद केले आहे. मात्र, महापालिकेकडून अद्याप त्याबाबत काहीच हालचाली झालेल्या नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
व्यावसायिक भागातील ध्वनिप्रदूषण
शहरात मोठ्या प्रमाणात लहान औद्योगिक क्षेत्रे आहेत. तर, मोठ्या प्रमाणात व्यावसायिक क्षे़त्र आहेत. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मानंकानुसार, व्यावसायिक क्षेत्राच्या ठिकाणी सकाळी सहा ते रात्री १० या वेळेत ६५ डेसीबलपर्यंत, रात्री १० ते सकाळी ५ पर्यंत ५५ डेसीबल ध्वनिमर्यादा असणे आवश्यक आहे. मात्र, शहरात हे प्रमाण सरासरी ७५ ते ६० डेसीबल आहे. गेल्या तीन ते चार वर्षांत शहरातील दुचाकींची मोठ्या प्रमाणात संख्या वाढल्याने ही स्थिती उद्भवली असल्याचे महापालिका प्रशासनाचे मत आहे.
शांतता क्षेत्रात शांतता नावालाच
विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे शहरात मोठ्या प्रमाणात शैक्षणिक संस्था आहेत. तसेच मोठ्या प्रमाणात रुग्णालयेही आहेत. या शैक्षणिक संस्था तसेच रुग्णालयांच्या परिसरात १०० मीटर अंतरापर्यंत शांतता क्षेत्र घोषित केले जाते. अशी शहरात जवळपास ११०० शांतता क्षेत्र असून, या ठिकाणी माहिती फलक लावण्यासाठी पालिका दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करते. या ठिकाणी ध्वनीची पातळी दिवसा ५० डेसीबल तर रात्री ४० डेसीबल असणे आवश्यक आहे. मात्र, प्रत्यक्षात शहरात हे प्रमाण सरासरी ६० ते ५० डेसीबल असल्याचे दिसून येते. यासही वाढती वर्दळ आणि मोठ्या प्रमाणावरील नागरीकरण जबाबदार आहे.
रहिवासी क्षेत्रालाही ध्वनिप्रदूषणाचा विळखा
रहिवासी क्षेत्राच्या परिसरात दिवसा ५५ डेसीबल तर रात्री ४५ डेसीबलची ध्वनिमर्यादा निश्चित करून देण्यात आलेली आहे. मात्र, शहरातील कात्रज तलाव आणि खडकवासला परिसर वगळता कोठेही या मानकांएवढा ध्वनी नाही. शहरात सर्वत्रच सरासरी ७० ते ५५ डेसीबल ध्वनीची पातळी रहिवाशी क्षेत्रात दिसून येते. त्यामुळे रहिवासी क्षेत्रातही ध्वनिप्रदूषणाच्या विळख्यात आल्याचे स्पष्ट होते.