उड्डाणपुलासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून चिमुकल्याचा मृत्यू; दप्तर तरंगताना दिसल्याने उघड झाली घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2025 12:41 IST2025-03-30T12:40:41+5:302025-03-30T12:41:36+5:30
- कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे चिमुकल्याचा मृत्यू; दहा फुटाच्या खड्ड्यात चार फुट पाणी; दप्तर तरंगताना दिसल्याने उघड झाली घटना

उड्डाणपुलासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून चिमुकल्याचा मृत्यू; दप्तर तरंगताना दिसल्याने उघड झाली घटना
पुणे - घोरपडी गाव येथे बांधण्यात उड्डाणपुलाचे काम सुरु असून त्यासाठी रस्त्यावर येणाऱ्या रेल्वे ट्रॅकवरील खड्डा आहे. खोदला त्या खड्ड्यातील पाण्यात पडून नऊ वर्षीय शाळकरी मुलाचा बुडून मृत्यू झाला. ही घटना शनिवारी रात्रीच्या सुमारास उघडकीस आली. पुलाचे बांधकाम करणाऱ्या कंत्राटदाराचा निष्काळजीपणा समोर आला असून, घोरपडीतील नागरिकांनी संताप व्यक्त केला. क्रिश सुभाष अंगरकर (वय ९, रा. खान रोड, गुरुद्वाराजवळील आर्मी सर्व्हट क्वार्टर) असे मृत मुलाचे नाव आहे.
याबाबत पोलिस उपनिरीक्षक भीमराव मांजरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, क्रिश सुभाष अंगरकर हा त्याच्या मोठ्या भावासह घोरपडी येथील स्वामी विवेकानंद शाळेत इयत्ता चौथीत शिकत होता. शुक्रवारी नेहमीप्रमाणे ते दोघे भाऊ सकाळी दहाच्या सुमारास शाळेत गेले होते. सायंकाळी मात्र मोठ्या भावाला क्रिश शाळेत दिसला नाही. क्रिश घरी गेला असेल असे समजून मोठा भाऊ एकटाच घरी आला. मात्र क्रिश घरी नव्हताच. रात्र होऊनही तो घरी न आल्याने त्याच्या परिवाराने वानवडी पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल केला.
शाळेच्या रस्त्यावरच उड्डाणपुलाचे खांब उभारण्यासाठी दहा फूट खोल खड्डे खोदण्यात आले असून त्यात सहा फुटांपर्यंत पाणी साचले होते. शाळेतून येताना याच खड्यात पडून पाण्यात बुडून क्रीशचा मृत्यू झाला.
पाणी उपसून बाहेर काढला मृतदेह
शनिवारी सायंकाळी त्या पाण्यावर शाळेची बॅग तरंगताना दिसली. नागरिकांना शंका आल्याने त्यांनी शेजारीच असलेल्या घोरपडी पोलिस चौकीत घटना कळवली. पोलिस उपनिरीक्षक भीमराव मांजरे यांनी अग्निशमन दलाला कळवले. अग्निशामक दलाने खड्ड्यातील पाणी पंपाद्वारे उपसले. त्यानंतर दीड फुटावर मृतदेह आढळला.
पुलाचे बांधकाम करताना कंत्राटदाराने खबरदारीच घेतलेली नाही
पुलाचे बांधकाम अतिशय संथ गतीने सुरू आहे, जेथे पिलर उभारण्यासाठी खड्डा केला आहे तो व्यवस्थित झाकलेला नाही, त्यामुळे कोणीही तेथे सहज जाऊन शकतो. अनेक दिवसांपासून त्यात पाणी साचलेले असल्याने येथे दुर्गंधी असते. खड्डे खोदल्यावर पुरेशी सुरक्षा यंत्रणा उभी केली नाही. त्यामुळे या कंत्राटदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.