संजीव पुनाळेकरांची अटक हा हिंदूंवर दमनशक्तीचा प्रयोग
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2019 16:20 IST2019-06-06T15:33:39+5:302019-06-06T16:20:58+5:30
काश्मिरी हिंदुचा आवाज दाबण्याकरिता काश्मिरी हिंदुंच्या नेत्यांना मारण्यात आले. त्याप्रमाणे हिंदुंचा आवाज बुलंद करणाऱ्या वकिल संजीव पुनाळेकर यांना अटक करुन दमनशक्तीचा प्रयोग केला जात आहे. त्यामुळे पुनाळेकरांची सुटका होईपर्यंत देशभरातील विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना तसेच अधिवक्ता यांचे आंदोलन सुरु राहणार असल्याचा इशारा समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनेने दिला.

संजीव पुनाळेकरांची अटक हा हिंदूंवर दमनशक्तीचा प्रयोग
पुणे : काश्मिरी हिंदुचा आवाज दाबण्याकरिता काश्मिरी हिंदुंच्या नेत्यांना मारण्यात आले. त्याप्रमाणे हिंदुंचा आवाज बुलंद करणाऱ्या वकिल संजीव पुनाळेकर यांना अटक करुन दमनशक्तीचा प्रयोग केला जात आहे. त्यामुळे पुनाळेकरांची सुटका होईपर्यंत देशभरातील विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना तसेच अधिवक्ता यांचे आंदोलन सुरु राहणार असल्याचा इशारा समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनेने दिला. गुरुवारी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक सुनील घनवट यांनी ही माहिती दिली.
डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येतील आरोपी शरद कळसकर आणि सचिन अंदुरे यांच्याकडे चौकशी केली असता त्यातून अनेक धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले. त्यातून सीबीआयने सनातनचे वकिल संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांना अटक केली. ही अटक करुन एका खोट्या आरोपाखाली सीबीआयने सूड उगवला असलयचे संघटनेने म्हटले आहे. तसेच या अटकेमुळे समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि कार्यकर्ते यांच्यात संताप निर्माण झाला आहे. त्यामुळे देशभरात विविध ठिकाणी अनेक हिंदुत्वनिष्ठ संघटना निवेदने, तक्रारी करुन, निदर्शने करुन या मुद्याकडे शासनाचे लक्ष वेधले आहे. जोपर्यंत सीबीआय पुनाळेकर यांच्यावरील खोटे आरोप मागे घेऊन त्यांची तात्काळ सुटका करीत नाही तोपर्यंत देशभरातील विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना आंदोलन सुरु ठेवण्यात येणार आहे. पोलीस कोठडीत एका आरोपीला जबर मारहाण करुन घेतलेल्या जबाबावरुन पुनाळेकर यांना लोकसभेच्या निवडणूका झाल्यानंतर अटक करणे हे मोठे षडयंत्र आहे. यासर्वाचा निषेध म्हणून थेट सीबीआयच्या कार्यालयासमोर निदर्शने करणार असल्याचे घनवट यांनी सांगितले. यावेळी पनुन काश्मिरचे रोहीत भट, अखिल राजस्थान समाज संघाचे जयसिंग राजपुरोहित, सावरकर युवा विचार मंचचे डॉ.निलेश लोणकर, पराग गोखले उपस्थित होते.