संतोष देशमुख प्रकरण, परभणी प्रकरण यामुळे राज्यात कायद्याचा धाक उरला नाही - सुप्रिया सुळे
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 11:36 IST2025-01-24T11:35:53+5:302025-01-24T11:36:01+5:30
राजकारण बाजूला ठेवून महाराष्ट्रासाठी सर्व पक्षाची बैठक बोलवावी, सुप्रिया सुळेंची मागणी

संतोष देशमुख प्रकरण, परभणी प्रकरण यामुळे राज्यात कायद्याचा धाक उरला नाही - सुप्रिया सुळे
इंदापूर : संतोष देशमुख खून प्रकरण, परभणी प्रकरण यामुळे कायद्याचा धाक उरला नाही. कायद्याची भीती राहिली नाही. त्यामुळे राजकारण बाजूला ठेवून महाराष्ट्रासाठी सर्व पक्षाची बैठक बोलवावी, अशी मागणी खासदार सुळे यांनी शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत केली.
सुळे म्हणाल्या की, चारशे कोटी रुपयांचा पीक विम्याचा घोटाळा झाला हे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे कबूल करत आहेत, तर चारशे कोटी नव्हे पाच हजार रुपयांचा घोटाळा झाला, असे त्यांच्याच पक्षातील आमदार सुरेश धस म्हणत आहेत, त्याची चौकशी का होत नाही हा प्रश्न आहे. केंद्र सरकार महाराष्ट्राला निधी देत नाही. हार्व्हेस्टरमागे सरकारने आठ लाख रुपये मागितले, असे राज्याचे कृषिमंत्री कोकाटे म्हणतात. तीन ते चार टक्के भ्रष्टाचार होतो, अशी कबुली ते देतात हा खूप गंभीर विषय आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणे हे माझे कर्तव्य आहे. त्यामुळे आपण हा मुद्दा संसदेत मांडणार आहोत. संसदेमध्ये महाराष्ट्रातील विविध प्रश्नांसाठी न्याय मागणार. या अधिवेशनानंतर महाराष्ट्राला न्याय मिळाला नाही तर आम्हाला आंदोलन करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही, असे त्या म्हणाल्या.
उत्तम जानकर आमदार निवडून आले असले तरी त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यामुळे आपणास निवडणुकीच्या पारदर्शकतेबाबत प्रश्न पडतो आहे. जर लोक बॅलेटवर निवडणूक असे म्हणत असतील. मतदानाच्या मुद्द्यावरून समाजात अस्वस्थता असेल तर लोकांच्या मागणीप्रमाणे बॅलेट पेपरवर निवडणुका घेतल्या जाव्यात, असे त्या म्हणाल्या. सत्तेवर आल्यानंतर शंभर दिवसांचा कार्यक्रम देणार, असे सरकार सांगत होते. आज सरकार येऊन साठ दिवस झाले. कोणतेही काम झाले नाही, अशी टीका त्यांनी केली.
माझ्यासह, जितेंद्र पवार, रोहित पवार, संदीप क्षीरसागर, बजरंग सोनवणे, अंजली दमानिया, नमिता मुंडदा व इतर असे नऊ जण व काँग्रेसचे लोक सातत्याने वाल्मीक कराड यांना खूनप्रकरणी आरोपी करा हा मुद्दा मांडत आहेत. राज्यातील सहा पक्ष सातत्याने ही मागणी करत आहेत. मुख्यमंत्र्यांनी याचे उत्तर दिले पाहिजे, अशी मागणी करत सरकार खुनी लोकांना का लपवत आहे, असा सवाल खा. सुळे यांनी उपस्थित केला.