नुकसान सहन करून कांदा बाजारात विक्री
By admin | Published: July 9, 2015 02:03 AM2015-07-09T02:03:58+5:302015-07-09T02:03:58+5:30
कांद्याचे बाजारभाव काहीसे कमी झाले असले, तरी बराखीतील कांदा शेतकरी विक्रीसाठी बाहेर काढू लागला आहे. शेतात असताना कांद्याला पावसाचा तडाखा बसला होता.
मंचर : कांद्याचे बाजारभाव काहीसे कमी झाले असले, तरी बराखीतील कांदा शेतकरी विक्रीसाठी बाहेर काढू लागला आहे. शेतात असताना कांद्याला पावसाचा तडाखा बसला होता. त्यामुळे सड होण्याचे प्रमाण जास्त असल्याने शेतकऱ्यांपुढे कोणताही पर्याय नाही. शेतकऱ्यांना सध्या मोठ्या प्रमाणावर नुकसान सहन करावे लागत आहे.
मागील वर्षी कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी ‘अच्छे दिन’ होते. या वर्षी मात्र परिस्थिती वेगळी आहे. कांदा लागवडीसाठी महागड्या दराने रोप व बी खरेदी करावे लागले. नंतर बनावट बियाण्यामुळे डेंगळे तयार झाले. कांदापीक जोमात आल्यानंतर दोन वेळा अवकाळी पावसाचा तडाखा बसला. वातावरणातील बदलाचा फटकासुद्धा पिकावर झाला. या वर्षी शेतकऱ्यांच्या भांडवलात वाढ झाली आहे.
कांदा काढणीनंतर पावसाचा व्यत्यय आला होता. अनेक शेतकऱ्यांनी कांद्याची शेतातूनच विक्री केली, तर काहींनी तो बराखीत साठवून ठेवला होता. डेंगळे कांदे मातीमोल भावाने विकले गेले. शेतात असताना पावसाने कांदा भिजला; परिणामी काढणी करतानाच कांदा सडू लागला होता.
बराखीत साठवणूक करताच कांद्याची सड होऊ लागली. अनेक शेतकऱ्यांचा कांदा मोठ्या प्रमाणात सडला. मध्यंतरी १० किलोस २५० रुपयांपर्यंत बाजारभाव गेला होता.
बाजारभाव कमी होऊनही शेतकरी बराखीत कांदा विक्रीसाठी आणत आहे. बराखीत सडलेला कांदा मोठ्या प्रमाणावर निघत आहे. तो अक्षरश: फेकून द्यावा लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याची माहिती माजी उपसरपंच जगदीश अभंग यांनी दिली.