भोर तालुक्यातील सात ग्रामपंचायतींत कोरोनाचा शिरकाव नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:11 AM2021-05-27T04:11:45+5:302021-05-27T04:11:45+5:30
भोर तालुक्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहेत. त्यामुळे भोर शहरातील आणि ग्रामीण भागातील कोविड सेंटरमधील बेड कमी पडणे तर ...
भोर तालुक्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहेत. त्यामुळे भोर शहरातील आणि ग्रामीण भागातील कोविड सेंटरमधील बेड कमी पडणे तर अनेक ठिकाणी ऑक्सिजनची कमतरता जाणवत आहे. शासनाने अनेक निर्बंध लावले आहेत. मात्र तरीही शहरात आणि ग्रामीण भागात दररोज कोरोना रुग्ण आढळत आहेत. ११३ जणांचा मृत्यू झालेला आहे. यामुळे लोकांसह प्रशासनाची चिंता वाढताना दिसत आहे. शासकीय कोविड सेंटरसह खाजगी दवाखान्यातही कोविड सेंटर नवीन सुरू केले आहेत.
भोर तालुक्यातील १९६ गाव वाड्यावस्त्या आहेत. पैकी ७३ ग्रामपंचायतींत पुण्या मुंबई किंवा बाहेरून आलेले रुग्णांना कोरोनाची लागण झाली असून, एक ते चारपर्यंत कोरोनाचा आकडा आहे. यातील अनेकजण उपचार घेऊन घरी आले आहेत. ७६ ग्रामपंचायतींत कोरोना झालेले नागरिक बरे होऊन घरी आल्यामुळे सदर गावात सध्या कोरोनाचा एकही रुग्ण नाही. तालुक्यातील नीरादेवघर धरणखोऱ्यातील हिर्डोशी भागातील पऱ्हर बुद्रुक, पऱ्हर खुर्द, शिरवली हि. मा., दुर्गाडी या गावांत तसेच भाटघर धरणपट्ट्यातील भुतोडे खोऱ्यातील करंदी खुर्द व करंदी बुद्रुक या दुर्गम डोंगरी भागातील ७ ग्रामपंचायतींत पहिल्या आणि दुसऱ्या दोन्ही लाटेत अद्याप कोरोनाचा शिरकाव झालेला नाही. सध्या बाहेरगावी असलेल्या लोकांमुळे गावे रिकामी आहेत. मात्र भविष्यात बाहेर असलेले नागरिक गावात परत येण्यास सुरुवात झालेली आहे. त्यामुळे कोरोनाचा शिरकाव नसलेल्या गावात कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. यासाठी प्रशासनाने आणि ग्रामपंचायतीने लक्ष देण्याची खरी गरज आहे.
--
कोट
कामानिमित्त बाहेरगावी असलेल्या नागरिकांना गावात पुन्हा यायचे झाल्यास त्यांना प्रशासन व ग्रामपंचायतकडून कोरोना टेस्ट करुन शहरातील कोविड सेंटरला ठेवले जाणार आहे. यामुळे गावात नव्याने कोरोनाचा शिरकाव होणार नाही, याची काळजी घेतली जात आहे. विशाल तनपुरे (गटविकास अधिकारी, पंचायत समिती, भोर)
--
चौकट
--
दुर्गम डोंगरी गावे शहराचा संपर्क कमी, त्यामुळे कोरोनाचा शिरकाव नाही
भोर तालुक्यातील भाटघर भागातील भुतोंडे खोरे व नीरादेवघर धरणभागातील तर हिर्डोशी भागातील लोकांचा आंबवडे भागातील काही गावे भोर शहरासी फारसा संपर्क नाही. कामानिमित्त बाहेर असलेले नागरिक सहजासहजी गावाला येत नाहीत. यामुळे कोरोनाच्या दोन लाटेतही कोरोनाचा शिरकाव झालेला नाही. मात्र भविष्यात बाहेरचे नागरिक गावात यायला सुरवात झाल्यास आणि रिकामे गावे पुन्हा भरायला लागल्यास कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो.