सोनपावलांनी आली गौराई; घरोघरी पंचपक्वानांचा नैवेद्य
By admin | Published: September 21, 2015 04:16 AM2015-09-21T04:16:09+5:302015-09-21T14:44:40+5:30
गणपतीच्या घरी माहेरवाशीण म्हणून बहिणी तीन दिवस येतात. ‘गौराई आली सोन्याच्या पावली’ असे म्हणत तिचे स्वागत केले जाते.
पुणे : गणपतीच्या घरी माहेरवाशीण म्हणून बहिणी तीन दिवस येतात. ‘गौराई आली सोन्याच्या पावली’ असे म्हणत तिचे स्वागत केले जाते. पहिल्या दिवशी तिला भाजीभाकरीचा नैवैद्य दाखवतात. लाडू, चिवडा, करंजी असे फराळाचे पदार्थ करून तिचे कोडकौतुक केले जाते. गणपतीबरोबरच तिची मनोभावे आरती केली जाते. भाद्रपद षष्ठी ही गौरी म्हणजेच महालक्ष्मी बसविण्याची तिथी असते. दुसऱ्या दिवशी गौरीजेवण. म्हणजेच १५ भाज्या, विविध कोशिंबिरी आणि गोडधोडाचे जेवण. यातही पुरणपोळीच्या नैवेद्याला विशेष महत्त्व असते. भाद्रपद महिन्यात शेती पिकांनी फुललेली असल्याने गौरीला वेगवेगळी फुले आणि पत्री वाहण्याची प्रथा आहे. यात केवडा, दवणा, शमी, कमळफूल याचा समावेश असतो. गौरी जेवणाच्या दिवशी संध्याकाळी नातेवाईक, आप्तेष्ट यांना गौरीच्या हळदी-कुंकवासाठी आमंत्रण दिले जाते. त्यानिमित्ताने एकमेकांच्या घरी जाणे-येणे होते. मग तिसऱ्या दिवशी या गौरी सर्वांचे मन प्रसन्न करून गणपतीसोबत निरोप घेतात. या दिवशी दहीभात आणि खीर याचा नैवेद्य असतो.