सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांनी भेटून विनंती केल्याने बारामतीत पाठिंबा ; प्रकाश आंबेडकरांचे स्पष्टीकरण
By अजित घस्ते | Updated: April 29, 2024 16:29 IST2024-04-29T16:29:01+5:302024-04-29T16:29:42+5:30
वंचितसाठी यंदा सकारात्मक वातावरण असून यावेळी आम्ही आमचे लोकसभेचे खाते नक्की उघडू

सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांनी भेटून विनंती केल्याने बारामतीत पाठिंबा ; प्रकाश आंबेडकरांचे स्पष्टीकरण
पुणे: ‘‘सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांनी भेटून विनंती केल्यामुळे आम्ही बारामतीमध्ये उमेदवार दिलेला नाही. शरद पवार हे सध्या बारामतीतच अडकून पडले आहेत. वंचितसाठी यंदा सकारात्मक वातावरण असून यावेळी आम्ही आमचे लोकसभेचे खाते नक्की उघडू,’’ असा विश्वास वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला.
वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार वसंत मोरे यांच्या प्रचाराची सुरुवात सोमवारी ॲड. आंबेडकर यांच्या उपस्थितीत करण्यात आली. त्यानिमित्ताने सोमवारी पानमळा येथे आयोजित पत्रकार परिषदेत ॲड. आंबेडकर बोलत होते. वंचितचे उमेदवार वसंत मोरे यांच्या प्रचाराचा शुभारंभ पानमळातून करण्यात आला.
यापुढे आंबेडकर म्हणाले, नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून देशावरील कर्ज वाढले आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीताराम यांचे पती प्रभाकरण १० दिवसांपुर्वी म्हणाले की, मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तर लोकशाही संपेल. निवडणुका होणार नाहीत. संविधान संपेल. गल्लोगल्ली मणिपूरसारखी परिस्थिती निर्माण होईल. त्याबरोबर सध्या लोकसभा निवडणूकीत १२ मतदार संघात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात थेट लढत असल्याचे चित्र आहे. त्या मतदार संघात मात्र वंचित फायदा होणार आहे. सेक्युलर मतदार सध्या वंचितकडे ओळणार असल्याचे दिसते. महाराष्ट्रात सर्वच मतदार संघात मोठी अटितटीची लढाई आहे. मोदी शासनाने कबूल केले आहे की, १७ लाख कुटुंबानी भारत सोडला आहे. अनेकांनावर दबाव टाकण्यात आला होता. त्यामुळे ते परदेशात जावून बसले आहेत. अझानच्या भूमिकेमुळे मुस्लिम मतदार एकतर्फी वसंत मोरे यांना मतदान करतील. मोरे यांनी मुस्लिमांची बाजू घेतली म्हणून त्यांना डावलले जात होते. पुण्यातील उमेदवार मोठ्या फरकाने निवडणून येणार नाही.
यंदा मोदींना ३०० पेक्षा कमी जागा मिळतील
देशात सध्या संविधान बदलणार असल्याचे भाजपाच्या नेतेकडून बोलले जात आहे. तशी परस्थिती निर्माण केली जात आहे. मात्र मोदी हे बाबासाहेब आले तरी संविधान बदलू शकत नाही, असा खोटा दावा करत आहेत. मात्र ते पंतप्रधान आहेत. त्यामुळे त्यांना कायद्यात बदल करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे ते बोलत आहे. सरकारच्या विरोधात जनतेच्या मनात राग आहे. तो राग मतदानातून दिसेल. त्यामुळे सध्या विविध सर्व्हे भाजपला ३०० पेक्षा कमी मिळतील असे चित्र दिसत आहे.