दौंड रेल्वे जंक्शन भागातील अर्थकारण कोलमडले; बंद केलेल्या रेल्वेगाड्यांच्या थांब्यांचा प्रश्न थेट दिल्ली दरबारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2024 12:47 IST2024-12-13T12:47:22+5:302024-12-13T12:47:31+5:30
दाैंड रेल्वेस्थानकावर या अगोदर ८० रेल्वेगाड्या थांबत होत्या, त्यांची संख्या एकदम अर्ध्याने कमी केल्याने या भागातील अर्थकारणावर विपरीत परिणाम होत आहे.

दौंड रेल्वे जंक्शन भागातील अर्थकारण कोलमडले; बंद केलेल्या रेल्वेगाड्यांच्या थांब्यांचा प्रश्न थेट दिल्ली दरबारी
बारामती : दाैंड रेल्वेस्थानकावर या अगोदर ८० रेल्वेगाड्या थांबत होत्या, त्यांची संख्या एकदम अर्ध्याने कमी करण्यात आली असून सध्या याठिकाणी केवळ ४० रेल्वेगाड्या थांबत आहेत. आता बंद करण्यात आलेले रेल्वेगाड्यांचे थांब्यांचा प्रश्न दिल्ली दरबारी पोहोचला आहे. त्यामुळे लवकरच हा प्रश्न मार्गी लागण्याची चिन्हे आहेत.
या दौंड स्थानकबरोबरच बारामती लोकसभा मतदारसंघातील जेजुरी, नीरा आणि अन्य स्थानकांवरील रेल्वेगाड्यांचे थांबे कमी न करता वाढवण्याची गरज आहे, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत केली. संसदेत झालेल्या प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान त्यांनी रेल्वे मंत्रालयाविषयी प्रश्न उपस्थित केला. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी लवकरच सर्व थांबे पूर्ववत सुरू करण्यात येतील, अशी ग्वाही दिली.
रेल्वेमध्ये सध्या स्वच्छतेचे काम चांगल्या प्रकारे होत असल्याबद्दल सुप्रिया सुळे यांनी रेल्वे मंत्रालयाचे अभिनंदन केले. असे असले तरी बारामती लोकसभा मतदारसंघातील दाैंड, निरा, जेजुरी स्थानकांवर रेल्वेगाड्यांचे थांबे कमी करण्यात आल्याचे त्यांनी लक्षात आणून दिले. रेल्वेची कार्यक्षमता वाढवण्यासाठी काही थांबे कमी केल्याचे रेल्वे मंत्रालय सांगत आहे. मात्र, या निर्णयामुळे त्यामुळे दौंड, बारामती, नीरा तसेच जेजुरी या भागातील अर्थकारण अडचणीत आले आहे.
दौंड हे बारामती लोकसभा मतदारसंघातील एक मोठे जंक्शन आहे. रेल्वेच्या माध्यमातून उत्तर भारताला दक्षिण भारताशी जोडणारे हे एक मोठे स्थानक असून या भागातील खूप मोठे अर्थकारण रेल्वेवर अवलंबून आहे. याठिकाणी पूर्वी ८० रेल्वेगाड्यांना थांबा होता, तो एकदम ४० वर आणण्यात आला आहे. परिणामी, या भागातील अर्थकारणावर विपरीत परिणाम होत आहे. हे लक्षात घेऊन रेल्वे मंत्रालयाने कार्यक्षमता वाढवण्यासाठी थांबे कमी करण्यापेक्षा इतर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी सुळे यांनी यावेळी केली. त्यांना सकारात्मक प्रतिसाद देत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी लवकरच हा प्रश्न सोडवण्यात येईल, अशी ग्वाही दिली.