पाऊस कोपला अन् घास हिरावला! विम्याच्या दाव्यासाठी राज्यात ७६.३६ लाख तक्रारी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2024 12:56 PM2024-10-20T12:56:28+5:302024-10-20T13:00:46+5:30

सर्वाधिक १० लाख तक्रारी एकट्या बीड जिल्ह्यातून आल्या आहेत

The rain stopped and the grass was gone! 76.36 lakh complaints in the state for insurance claims | पाऊस कोपला अन् घास हिरावला! विम्याच्या दाव्यासाठी राज्यात ७६.३६ लाख तक्रारी

पाऊस कोपला अन् घास हिरावला! विम्याच्या दाव्यासाठी राज्यात ७६.३६ लाख तक्रारी

लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे: यंदा वेळेवर दाखल झालेल्या मान्सूनने खरिपातील पेरण्या साधल्या. मात्र, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर तसेच ऑक्टोबरमधील परतीच्या पावसामुळे ऐन काढणीला आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. त्यामुळे खरीप पिक विमा काढलेल्या राज्यातील शेतकऱ्यांनी विमा कंपन्यांकडे नुकसान भरपाईसाठी सुमारे ७६ लाख ३६ हजार तक्रारी अर्थात दावे दाखल केले आहेत. या सर्वेक्षणाचे क्षेत्रीय पातळीवर सुरू असून नुकसान भरपाईबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे कृषी संचालक विनयकुमार आवटे यांनी दिली. सर्वाधिक १० लाख तक्रारी एकट्या बीड जिल्ह्यातून आल्या आहेत.

राज्यात यंदा पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेत १ कोटी ६५ लाख शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला आहे. ऑक्टोबरमध्ये आलेल्या परतीच्या पावसामुळे पिकांचे आणखीन नुकसान झाले त्यामुळे हातात तोंडाशी आलेला घास पावसाने हिरावला. त्यामुळेच नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांनी विमा कंपन्यांकडे तब्बल ७६ लाख ३६ हजार ८६७ तक्रारी दाखल केल्या आहेत.

शंभर टक्के नुकसानग्रस्त क्षेत्राचे सर्वेक्षणाची गरज

- याबाबत आवटे म्हणाले, “नुकसानीचे सर्वेक्षण क्षेत्रीय पातळीवर सुरू आहे. विमा संरक्षित क्षेत्राच्या पंचवीस टक्क्यांपेक्षा जास्त क्षेत्रावर नुकसान झाले असल्यास नुकसानाची तीव्रता जास्त असल्याचे गृहीत धरून सरासरी ३० टक्के नुकसानग्रस्त नमुन्यांचे सर्वेक्षण केले जाते. यातून आलेल्या नुकसानीची सरासरी काढून त्याचा भरपाई दावा काढण्यात येईल. व त्यानुसार सर्व क्षेत्रावरील शेतकऱ्यांचे समान नुकसान झाल्याचे गृहित धरण्यात येते. त्यामुळे सर्व शंभर टक्के नुकसानग्रस्त क्षेत्राचे सर्वेक्षण करण्याची गरज भासत नाही.
- राज्यात ही स्थिती सर्वदूर आहे. या नुकसानीचा अहवाल तालुका स्तरावरील समितीकडून जिल्हास्तरावर पाठविला जाईल. त्यानंतर राज्यस्तरावर त्या संदर्भात निर्णय घेऊन नुकसान भरपाईबाबत सरकारकडे अहवाल सादर करण्यात येईल त्यानुसार विमा कंपन्यांना नुकसान भरपाईसाठी आदेश देण्यात येतील.” 
- शेतकऱ्यांना या तक्रारी ऑनलाईन व ऑफलाईनही करता येतात. त्यात ७६ लाख २० हजार २४४ तक्राी ऑनलाईन तर १६ हजार ६२३ तक्रारी ऑफलाईन आल्या आहेत. सर्वाधिक १० लाख ८७ हजार ९४४ तक्रारी एकट्या बीड जिल्ह्यातून आल्या आहेत. त्या खालोखाल ८ लाख ९ हजार २३५ तक्री नांदेड जिल्ह्यातून आल्या आहेत. या पावसाचा सर्वात मोठा फटका, उडीद, मूग, सोयाबीन, कापूस, भाजीपाला, बाजरी या पिकांना बसला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडेच मोडले आहे.

परतीच्या पावसाचे धूमशान; दोन दिवस अलर्ट

- नाशिक/जळगाव/ नागपूर : राज्यात परतीच्या पावसाने राज्याच्या बहुसंख्य भागात धुमाकूळ घातले असून, पिकांची नासाडी केली आहे. विशेषत: खान्देशातील जळगाव आणि नाशिक जिल्ह्यात पावसाचा जोर आहे. त्यातच हवामान खात्याने आणखी दोन दिवस पावसाचा अलर्ट जारी केला आहे. 
- गुरुवारपासून नाशिक आणि जळगाव जिल्ह्यांत जोरदार हजेरी लावणाऱ्या पावसाने देवळा आणि सुरगाणा येथे पिकांसह घरांचे नुकसान केले आहे. कांदा आणि भात पिकासाठी हा पाऊस नुकसानदायक असून, जिल्ह्यातील धरणांमधून पुन्हा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

वीज पडून ११ वर्षीय बालक ठार

जळगाव: जळगाव जिल्ह्यात शुक्रवारी रात्री झालेल्या परतीच्या वादळी पावसाने केळी, मका, कपाशी, सोयाबीन पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. तर अंगावर वीज पडल्याने एका ११ वर्षीय बालकाचा मृत्यू झाला.

जिल्हानिहाय पीक विम्याच्या तक्रारी

नगर    २६४७७९
नाशिक    ७३९०१
चंद्रपूर    ८७९३७
सोलापूर    १९८०७४
जळगाव    १३२४२२
सातारा    २४६७
परभणी    ७१५३४९
वर्धा    १८८२७०
नागपूर    ९१६२३
जालना    ४३५६७२
गोंदिया    ३१७
कोल्हापूर    ५९२६
ठाणे    ३७
रत्नागिरी    ४२
सिंधुदुर्ग    ६१
नांदेड    ८०९३२५
संभाजीनगर     ७८४५९०
भंडारा    १८६५६
पालघर     २६७०
रायगड    ६७७
वाशिम     २८०६४३
बुलढाणा    ४४५११९
सांगली     १५७२७
नंदुरबार     २९९४४
बीड    १०८७९४४
हिंगोली    ४९३६००
अकोला    २६८५०४
धुळे    ६८४१०
पुणे    ६३२२
धाराशिव    ५५०१६३
यवतमाळ    ३९०३१३
अमरावती    १०९६५७
गडचिरोली    ३४४४
लातूर    ७४२८२
-------------------
एकूण ७६२०२४४
-------------------

वीज पडून अमरावतीत दोन ठार

अमरावती : जिल्ह्यात शनिवारी दुपारी वीज पडल्याने दोन व्यक्ती ठार, पाच महिला जखमी झाल्या आहेत. वीज पडून तीन म्हशी, १२ शेळ्या ठार झाल्या. या पावसाने काढणीच्या हंगामात सोयाबीनचे मोठे नुकसान झाले आहे.

Web Title: The rain stopped and the grass was gone! 76.36 lakh complaints in the state for insurance claims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.