Alphonso Mango: यंदा पाडव्याला आंब्याची गोड चव महागात; हापूसचे दर सामन्यांच्या आवाक्याबाहेरच
By अजित घस्ते | Updated: March 25, 2025 16:53 IST2025-03-25T16:51:28+5:302025-03-25T16:53:04+5:30
सध्या रत्नागिरी आणि देवगड हापूस आंबा पंधराशे ते दोन हजार रुपये डझन दराने उपलब्ध

Alphonso Mango: यंदा पाडव्याला आंब्याची गोड चव महागात; हापूसचे दर सामन्यांच्या आवाक्याबाहेरच
पुणे: लांबलेला परतीचा पाऊस, अपेक्षित थंडी नसणे आणि फेब्रुवारीपासून वाढलेले तापमान या वातावरणातील बदलाचा फटका हापूस आंब्याला बसला आहे. पहिल्या बहरातील आंब्याचा मोहोर गळून पडल्याने पिकावर परिणाम झाला असून, नेहमीच्या तुलनेत उत्पादन निम्म्याने घटले आहे. यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा आंब्याचा दर कमालीचा वाढला आहे. सध्या रत्नागिरी आणि देवगड हापूस आंबा पंधराशे ते दोन हजार रुपये डझन दराने उपलब्ध आहे. त्यामुळे यंदा पाडव्याला आंब्याची गोड चव महागात पडणार असून सामन्यांच्या आवाक्याबाहेरच आंबा गेला आहे.
आंब्यांच्या आगमनाची उत्सुकता उन्हाळ्याची चाहूल लागताच सर्वांना असते. फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आंब्यांची आवक वाढण्यास सुरुवात होते. मार्च महिन्यात मोठी आवक होत असते. गुढी पाडव्याला आंब्याची खरेदी मोठ्या प्रमाणात होत असते. यंदा आंब्यांची आवक दर वर्षी मार्केटयाडर्डातील फळ बाजारात कमी प्रमाणात झाली आहे. मार्चमध्ये कोकणातून दररोज चार ते पाच हजार पेट्यांची आवक होते. सध्या रोज ७०० ते एक हजार पेटी आंब्याची आवक होत आहे. पुढील महिन्यात आंब्यांची आवक वाढेल, असा अंदाज आहे.
असे आहेत आंब्याचे भाव
मार्च २०२४ मार्च २०२५
८०० ते १२०० रुपये १५०० ते २०००
पाडव्याला आंब्याचा दर , दरवर्षीपेक्षा जास्त
हवामान बदलामुळे उत्पादन घटल्याने सध्या आंब्यांची आवक कमी होत आहे.अनेक जण गुढी पाडव्याच्या अगोदर दोन ते तीन दिवस आंबा खरेदी करतात. दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी बाजार भाव जास्त मागील वर्षाच्या पाडव्याच्या दरम्यान असलेली आवक आणि या वर्षीची आवक यामध्ये लगबग ३० ते ४० टक्क्याने घट झाली आहे. मागील वर्षी प्रति डझन ५०० ते ७०० रुपये होता. तोच यावर्षी ऐन पाडव्याला एक हजार रुपयांपासून ते दोन हजार रुपये प्रति डझन ग्राहकांना घ्यावा लागत आहे. मागील वर्षाच्या तुलनेत आंबा उत्पादन ३० ते ४० टक्क्याने घट आहे. मागील वर्षे आवक लगबग प्रति दिवस पाडव्याच्या वेळी चार ते पाच हजार पेटी येत होती. तीच आता प्रति दिवस एक हजारापासून ते तीन हजारापर्यंत पेटी येत आहे. कोट :
व्यापारी वर्गांना यावर्षी रत्नागिरी आंबा विकण्यास अतिशय स्पर्धात्मक कार्य करावे लागणार आहे. त्यामुळे ग्राहकांना आंबा पटवून देणे व रत्नागिरी बाजारात विकणे अतिशय कठीण जाणार आहे. सध्याचे पेटीचे बाजार ४ डझन ते ७ डझन तीन हजारापासून ते आठ हजारापर्यंत आहे. यंदा मागील वर्षीच्या तुलनेत आवक ३० टक्केनी कमी आहे. यामुळे भावात तेजीत आहेत. - युवराज काची आंबा व्यापारी मार्केटयार्ड