पर्यटकांना ताम्हिणी अभयारण्यात प्रवेश बंदी! पावसाळ्यात अपघात वाढत असल्याने वन विभागाचा निर्णय
By श्रीकिशन काळे | Updated: June 29, 2024 17:36 IST2024-06-29T17:36:00+5:302024-06-29T17:36:27+5:30
सर्व पर्यटकांना वर्षा पर्यटनावेळी नियमांचे काटेकोर पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, प्रवेश बंदी असल्याने अवैधरित्या अभयारण्यात प्रवेश करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे....

पर्यटकांना ताम्हिणी अभयारण्यात प्रवेश बंदी! पावसाळ्यात अपघात वाढत असल्याने वन विभागाचा निर्णय
पुणे : सध्या पावसाळा सुरू झाल्याने पर्यटनासाठी नागरिक घराबाहेर पडत आहेत. वर्षा पर्यटनासाठी अनेकजण ताम्हिणी वन्यजीव अभयारण्यात जातात. परंतु, हे क्षेत्र अपघातप्रवण असल्याने या ठिकाणी पर्यटकांना ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत प्रवेश बंदी घालण्यात आली आहे, अशी माहिती उपवनसंरक्षक (वन्यजीव) तूषार चव्हाण यांनी दिली आहे.
ताम्हिणी वन्यजीव अभयारण्यातील प्लस व्हॅलीमध्ये पावसामुळे निसरड्या झालेल्या वाटांवर होणाऱ्या अपघाताचा धोका लक्षात घेऊन वन्यजीव विभागामार्फत निसर्गवाटा २८ जून २०२४ ते ३० जून २०२४ पर्यंत पर्यटनासाठी बंद करण्यात आल्या आहेत. ताम्हिणी परिसरात वर्षा ऋतूमधील आल्हाददायक परिसर व धबधब्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी मोठ्या प्रमाणावर होते. प्लस व्हॅलीतील मिल्की बार सारख्या धबधब्यातील कुंडामध्ये पाण्याच्या प्रवाहाचा व खोलीचा अंदाज न आल्याने अपघाताचे प्रमाण वाढल्याची शक्यता आहे. म्हणून ताम्हिणी वन्यजीव अभयारण्याच्या वतीने प्लस व्हॅलीमध्ये जाणाऱ्या सर्व पायवाटांचे प्रवेश प्रतिबंधित करण्यात आले आहेत.
सर्व पर्यटकांना वर्षा पर्यटनावेळी नियमांचे काटेकोर पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, प्रवेश बंदी असल्याने अवैधरित्या अभयारण्यात प्रवेश करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. अन्यथा संबंधित पर्यटकांवर वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येईल, असे विभागातर्फे सांगण्यात आले.