Maharashtra Rain: मान्सून लवकरच परतणार, हवामान विभागाकडून महत्वाची माहिती समोर
By श्रीकिशन काळे | Updated: September 21, 2024 18:31 IST2024-09-21T18:30:51+5:302024-09-21T18:31:33+5:30
महाराष्ट्रात वातावरणीय घडामोडी होत असल्याने मान्सून सुरवातीचे काही दिवस जागेवरच खिळण्याची शक्यता

Maharashtra Rain: मान्सून लवकरच परतणार, हवामान विभागाकडून महत्वाची माहिती समोर
पुणे : अति वायव्य राजस्थान व कच्छ परिसरातून वायव्य वारा, खालावणारी आर्द्रता व इतर काही वातावरणीय बदलानुसार सोमवारी (दि.२३)पासून मान्सून परतण्याची शक्यता जाणवत आहे, अशी माहिती सेवानिवृत्त हवामानशास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली. राज्यात आजपासून (दि.२१) काही भागात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
मान्सूनने जरी तोंड फिरवले तरी इतर काही वातावरणीय घडामोडीतून तो सुरवातीचे काही दिवस जागेवरच खिळण्याची शक्यता आहे. सप्टेंबर २१ ते २४ च्या दुसऱ्या आवर्तनातील पावसाची सुरवात प्रथमत: विदर्भात जोरदारपणे होईल. त्यानंतर मध्यम तीव्रतेने मराठवाड्यात तर मुंबईसह कोकण, खान्देश, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर जिल्ह्यात किरकोळ हलक्या पावसाने सुरवात होण्याची शक्यता आहे. सप्टेंबर २६ ते २९ दरम्यानच्याच्या तिसऱ्या आवर्तनातील चार दिवसात मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, नाशिक, उत्तर नगर, धुळे, जळगांव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया ह्या जिल्ह्यात जोरदार अतिजोरदार पावसाची शक्यता जाणवते. त्यातही २६, २७ ला खान्देश, नाशिक, छत्रपती संभाजीनगर व सभोंवतलातील परिसरात व २८, २९ ला मुंबई सह ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात अतिजोरदार पावसाची शक्यता जाणवते. ह्याचं चार दिवसात नाशिक जिल्ह्याच्या घाटमाथा व धरण क्षेत्रात होणाऱ्या जोरदार पावसामुळे गोदावरी खोऱ्यातील नद्यांना पुन्हा पूर- पाण्याची शक्यताही नाकारता येत नाही. आजपासून पाच दिवस शक्य तेवढ्या शेतमशागती व खरीप पीक काढणी कामाचा उरक करावा, असा सल्ला खुळे यांनी दिला आहे.