वीर धरण ९७.८३ टक्के भरले; १५ हजार ३१२ क्युसेक्सने विसर्ग सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2022 14:47 IST2022-07-16T14:46:20+5:302022-07-16T14:47:00+5:30
आता नीरा दुथडी वाहणार...

वीर धरण ९७.८३ टक्के भरले; १५ हजार ३१२ क्युसेक्सने विसर्ग सुरू
नीरा (पुणे) : नीरा नदीच्या धरण साखळीत संपूर्ण जून व जुलैचा पहिला आठवड्यात पावासाचे प्रमाण नगण्य होते. जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. या आठवड्यात तर पावसाने उसंतीच घेतली नाही. परिणामी शनिवारी दुपारी भाटघर धरण ५३.९३ टक्के, नीरा देवधर ४६.५३ टक्के, वीर धरण ९७.८३ टक्के, तर गुंजवणी धरण ७३.५१ टक्के भरले आहे. वीर धरणात पावसाचे पाणी वाढत असल्याने शनिवारी दुपारी चार वाजल्या पासून वीर धरणाच्या चार दरवाजे एक फुटांनी उचलून १५ हजार ३१२ क्युसेक्सने विसर्ग वाढविण्यात येणार असल्याची माहिती धरण प्रशासनाने दिली आहे.
शुक्रवारी सकाळपासून वीर धरणाच्या उजवा कालवा विद्युतगृहातुन १ हजार ४०० क्युसेक्सने व डावा कालवा विद्युतगृहातुन ३०० क्युसेक्सने असे नीरा नदीपात्रात १ हजार ७०० क्युसेक वेगाने पाणी नीरा नदी पात्रात सोडण्यात येत होते. त्यानंतर धरणसाखळीत पावसाचा जोर वढता राहिला परिणामी धरणातील पाणपातळी वाढत गेली. परिणामी वीर धरणाच्या सांडव्यातून दुपारी २ वाजता ४ हजार ४१८ क्युसेक्सनै विसर्ग सुरू करण्यात आला. त्यामुळे रात्रभर नीरा नदीपत्रात एकून ६ हजार १६८ क्युसेक्सने विसर्ग सुरु होता.
आज (शनिवारी) दिवसभर संतधारा सुरुच आहेत. वीर धरणात पाणी वाढतच आहे. शनिवारी दुपारी वीर धरण ९७.८३ टक्के भरले आहे. तसेच धरणाची पाणीपातळी वेगाने वाढत असल्याने शनिवारी दुपारी ४ वाजता ९ हजार १४४ क्युसेक्सने विसर्गात वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे नीरा नदीच्या पात्रात दुपारी चार नंतर १५ हजार ३१२ क्युसेक्सने विसर्ग वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे आता नीरा नदी दुथडी भरुन वाहणार असुन नदीचे सर्व बंधारे भरणार आहेत.
सध्या वीर धरणातून नीरा नदीच्या पात्रात ६१६८ क्युसेक विसर्ग सुरू आहे. धरणातील पाणी पातळी वाढत आहे. त्यामुळे ९ हजार १४४ क्सुसेक विसर्ग वाढविण्यात येणार आहे. नीरा नदीच्या पात्रात एकूण १५ हजार ३१२ क्युसेक विसर्ग राहील. आज दि.१६ जुलै रोजी दुपारी ४ वाजता विसर्ग वाढविण्यात येणार आहे. नदीकाठच्या सर्वांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे.