‘जीपीएस’द्वारे विद्यार्थ्यांचा ठावठिकाणा
By admin | Published: September 26, 2015 01:50 AM2015-09-26T01:50:39+5:302015-09-26T01:50:39+5:30
घराजवळ आलेल्या स्कूलबसमधून मुलगा शाळेत गेला, दुपारी, सायंकाळी शाळेची वेळ संपली, अपेक्षित वेळेत स्कूल बस परत आली नाही, तर पालकांना काळजी वाटते.
संजय माने , पिंपरी
घराजवळ आलेल्या स्कूलबसमधून मुलगा शाळेत गेला, दुपारी, सायंकाळी शाळेची वेळ संपली, अपेक्षित वेळेत स्कूल बस परत आली नाही, तर पालकांना काळजी वाटते. हुरहुर वाटू लागते. पालक चिंताग्रस्त होतात. आधुनिकतेची कास धरलेल्या शहरातील काही खासगी शाळांनी स्कूल बसला जीपीएस यंत्रणा बसवून पालकाची ही हुरहुर दूर केली आहे.
विद्यार्थी शाळेच्या बसने निघाल्यानंतर तो कोठे आहे, घराजवळ तो किती वेळात पोहोचेल, याची माहिती मोबाइल एसएमएसद्वारे पालकांना मिळू लागल्याने पालकांची चिंता दूर झाली असून, सुरक्षिततेच्या दृष्टीने ही सुविधा उपयुक्त ठरू लागली आहे.
सुभद्रा एज्युकेशन संस्थेच्या मोरवाडी, पिंपळे सौदागर आणि मोशी येथील शाळांमध्ये अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सुमारे तीन हजार विद्यार्थ्यांना सेन्सर असलेली ओळखपत्रे देण्यात आली आहेत. विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या २५ स्कूल बसला जीपीएस यंत्रणा जोडली आहे. ही यंत्रणा कार्यान्वित झाली असून, पालकांना घरबसल्या आपल्या पाल्याची माहिती मिळू लागली आहे. शाळा सुटल्यानंतर मुलगा बसमध्ये बसल्यापासून ते पदोपदी पालकांना एसएमएसद्वारे माहिती मिळू लागली आहे. घराजवळ बस येण्यास थोडा अवधी उरला असताना पाच मिनिटांत घराजवळ बस पोहचेल, अशी पूर्वकल्पना देणारा मोबाइलवर एसएमएस मिळतो.