आळंदीतील सर्वच वारकरी शिक्षण संस्था बंद होणार? ग्रामस्थांचा एकमताने ठराव मंजूर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2025 11:53 IST2025-01-11T11:52:47+5:302025-01-11T11:53:40+5:30
वारकरी शिक्षण संस्थेत शिक्षण घेणाऱ्या मुलांच्या आर्थिक शोषणाबरोबर लैंगिक शोषणाचे ही प्रकार घडत

आळंदीतील सर्वच वारकरी शिक्षण संस्था बंद होणार? ग्रामस्थांचा एकमताने ठराव मंजूर
आळंदी : तीर्थक्षेत्र आळंदीमध्ये अध्यात्मिक शिक्षणाबरोबर, शैक्षणिक शिक्षण ही खासगी वारकरी शिक्षण देण्यात येते. या संस्थांमध्ये कमीत कमी १० ते जास्तीत जास्त २०० विद्यार्थी असतात. विशेषतः मुले आणि मुली काही ठिकाणी एकत्र तर काही ठिकाणी वेगवेगळे असतात. त्यामुळे तिथे शिक्षण घेणाऱ्या मुलांचे आर्थिक शोषणाबरोबर लैंगिक शोषणाचे ही प्रकार घडत आहेत. या पार्श्वभूमीवर स्थानिक ग्रामस्थांनी एकमुखानी सर्वच वारकरी शिक्षण संस्था बंद करण्यात याव्या असा ठराव मंजूर करून घेतला आहे.
मागील काळात अशा अनेक घटना घडलेल्या आहेत. त्यावर पोलिस प्रशासनाने योग्य ती कारवाई केलेली आहे. या प्रकरणातील संबंधितांना शिक्षा झाली आहे. तर काही जण शिक्षा भोगत आहेत. परंतु अशा प्रकारावर आळा बसेल असे आळंदीकरांना वाटत होते. परंतु अशा घटना वारंवार घडतच आहेत. काही प्रकार उघडीस येतात. काही प्रकार उघडीस येत नाही. त्यामुळे तीर्थक्षेत्र आळंदीचे नाव खराब होत आहे. अशा घटनांचा तीव्र निषेध तसेच आळंदीकरांचा तीव्र उद्रेक पाहता समस्त आळंदीकर ग्रामस्थांची ज्ञानदर्शन धर्मशाळेत बैठक झाली. त्या बैठकीमध्ये सर्व ग्रामस्थांनी एक मुखानी सर्वच वारकरी शिक्षण संस्था बंद करण्यात याव्या असा ठराव मंजूर करून घेतला आहे. यापार्श्वभूमीवर शुक्रवारी (दि.१०) हजेरी मारुती मंदिरात पुढील नियोजनासाठी ग्रामस्थांची एकत्रित बैठक व याविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली.