इंदापुरात राजकीय बदलाचे वारे: हर्षवर्धन पाटलांनी कार्यकर्त्यांसमोर जाहीरपणे बोलून दाखवली खदखद, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2024 02:41 PM2024-08-30T14:41:35+5:302024-08-30T14:44:03+5:30

पुढील तीन-चार दिवसांत आणखी काही कार्यकर्त्यांशी चर्चा करून आपण अंतिम निर्णय घेऊ, असं हर्षवर्धन पाटील यांनी सांगितलं आहे.

Winds of political change in Indapur Harshwardhan Patil publicly spoke to the workers | इंदापुरात राजकीय बदलाचे वारे: हर्षवर्धन पाटलांनी कार्यकर्त्यांसमोर जाहीरपणे बोलून दाखवली खदखद, म्हणाले...

इंदापुरात राजकीय बदलाचे वारे: हर्षवर्धन पाटलांनी कार्यकर्त्यांसमोर जाहीरपणे बोलून दाखवली खदखद, म्हणाले...

BJP Harshwardhan Patil ( Marathi News ) : भाजप नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या संपर्कात असल्याची चर्चा रंगत आहे. अशातच आज पाटील यांनी इंदापुरातील आपल्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करत आगामी विधानसभा निवडणुकीबाबत कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या. या मेळाव्यात बहुतांश कार्यकर्त्यांनी आपण आता वेगळा निर्णय घ्यायला हवा, असा सूर आळवल्यानंतर हर्षवर्धन पाटील यांनीही आपल्या भाषणातून मनातील खदखद  बोलून दाखवत पुढील तीन-चार दिवसांत आणखी काही कार्यकर्त्यांशी चर्चा करून आपण अंतिम निर्णय घेऊ, असं सांगितलं आहे.

"लोकसभा निवडणुकीच्या वेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईत झालेल्या बैठकीत इंदापूरच्या जागेबाबत फडणवीस जो काही निर्णय घेतील, तो मान्य असेल, असं अजित पवार यांनी म्हटलं होतं. त्यानंतर फडणवीस यांनीही आपल्या तालुक्यात येऊन सांगितलं की मी इंदापूर तालुक्यासह हर्षवर्धन पाटील यांचेही राजकीय पालकत्व घेत आहे. मात्र काही दिवसांपूर्वीच अजित पवारांच्या पक्षाची एक यात्रा की जत्रा आपल्या तालुक्यात आली होती. यावेळी शासकीय योजनांच्या उद्घाटनाचा कार्यक्रमही पार पडला. हा शासकीय कार्यक्रम असताना महायुतीतील घटकपक्ष असूनही आपल्याला निमंत्रण देण्यात आलं नाही. उलट विद्यमान आमदारांनाच पुन्हा तिकीट देण्याचे संकेत अजित पवारांनी दिले," असं म्हणत कार्यकर्ता मेळाव्यात हर्षवर्धन पाटील यांनी आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विधानावर नाराजी व्यक्त करताना हर्षवर्धन पाटील म्हणाले की, "आपण कोणताही वेगळा निर्णय जाहीर केलेला नसताना किंवा तसं काही वक्तव्य केलं नसताना आपल्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जे काही बोलले, ते का बोलले हे मला समजलं नाही. कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र आहेत, आपण अपक्ष निवडणूक लढवावी, असं तुमच्यातील काही जण सुचवत आहेत. तर काहींचं म्हणणं आहे की दुसऱ्या एखाद्या पक्षात जावं. या सगळ्या भावना पुढील काही दिवसांत मी पक्षनेतृत्वाला सांगणार आहे. त्यासाठी मी देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेईन," अशा शब्दांत पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

दरम्यान, तुमच्या मनात काय चाललं आहे, याचा मलाही अंदाज आहे, असं कार्यकर्त्यांना म्हणत हर्षवर्धन पाटील यांनी आजच्या मेळाव्यात अप्रत्यक्षपणे आपण तुतारी हाती घेण्याच्या तयारीत असल्याचे संकेत दिले आहेत.

इंदापूरचं राजकीय गणित

भाजप नेते हर्षवर्धन पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील वैर सर्वश्रुत आहे. १९९५ मध्ये तालुका विकास आघाडीच्या माध्यमातून हर्षवर्धन पाटील यांनी राजकारणात प्रवेश केला. २००९ पर्यंत हर्षवर्धन पाटील हे अपक्ष म्हणूनच निवडून येत होते. मात्र, त्यांनी काँग्रेसलाच झुकते माप दिले. त्यांचा सहकारातील अभ्यास पाहता काँग्रेसने सहकारमंत्री बनवले होते. २०१४ मध्ये अजित पवार यांचे निकटवर्तीय आमदार दत्तात्रय भरणे यांनी त्यांचा पराभव केला. इतकंच नाही तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नेहमीच त्यांचा वचक कमी करण्याचा प्रयत्न केल्याचीही तालुक्यात चर्चा आहे. भाजपनेच तीच संधी साधून हर्षवर्धन पाटील यांना मैदानात उतरवले, पण त्याचा फारसा काही उपयोग झाला नसल्याने भाजपही नाराज असल्याचे समजते. 

लोकसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी करत विधानसभेचे आश्वासन देत हर्षवर्धन पाटील यांना अजित पवारांचे काम करण्यास सांगितले. मात्र, तसे झालेच नाही. त्यातच सध्या उपमुख्यमंत्री अजित अजित पवार यांनी इंदापूर विधानसभेवर दावा सांगितला असून आमदार दत्तात्रय भरणे यांनाच उमेदवारी देण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांच्या हालचाली वाढल्या आहेत.

दुसरीकडे, शरद पवार यांनी नेहमीच हर्षवर्धन पाटील यांना साथ दिली आहे. २००९ लोकसभा निवडणूक अटीतटीची झाली. त्यावेळी इंदापूर बाजार समितीत झालेली शेवटची सभा शरद पवार यांनी चांगलीच गाजवली अन् हर्षवर्धन पाटील निवडून आले. त्यानंतर पाटील हे जरी भाजपमध्ये गेले असले तरी वेळोवेळी पवारांनी त्यांना झुकते माप दिले. गेल्यावर्षी फेब्रुवारी महिन्यात कर्मयोगी साखर कारखान्याच्या सभासदांची आर्थिक कोंडी सुटावी म्हणून पुणे जिल्हा बँकेकडे २०० कोटींच्या कर्जाचा प्रस्ताव दिला होता. या प्रस्तावाला मंजुरी मिळावी म्हणून थेट शरद पवारांनी मध्यस्थी केली होती. त्यानंतर राष्ट्रीय साखर महासंघांच्या अध्यक्षपदी निवडीवेळीही पवारांनीच कळत न कळत पाठिंबा दिल्याचीही चर्चा आहे. यामुळे शरद पवारांबरोबर त्यांचे स्नेह कायम असल्याचे दिसते.

Web Title: Winds of political change in Indapur Harshwardhan Patil publicly spoke to the workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.