CM भजनलाल यांचा मोठा निर्णय; मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यामुळे सामान्यांना होणारा त्रास संपवला
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2024 20:07 IST2024-02-21T20:06:38+5:302024-02-21T20:07:33+5:30
राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी VIP कल्चर संपवण्याचा निर्णय घेतला आहे.

CM भजनलाल यांचा मोठा निर्णय; मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यामुळे सामान्यांना होणारा त्रास संपवला
Rajasthan: राजस्थानचेमुख्यमंत्री भजनलाल शर्मा (Bhajanlal Sharma) यांनी ऐतिहासिक निर्णय घेत VIP कल्चर बंद करण्यासाठी मोठा पुढाकार घेतला आहे. मुख्यमंत्री किंवा कोणत्याही मंत्र्याच्या ताफ्यासाठी रस्ता बंद केला जायचे, सामान्य नागरिकांना थांबवले जायचे. पण, आता राजस्थानमध्ये मुख्यमंत्रीदेखील सामान्य नागरिकांप्रमाणे ट्रॅफिकमध्ये फिरतील आणि रेड लाईटला गाडी थांबवतील. मुख्यमंत्र्यांनी डीजीपींना तसे निर्देशच दिले आहेत.
व्हीआयपी लोकांमुळे अनेकदा सामान्यांना त्रास सहन करावा लागायचा. पण, आता मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या या पुढाकारामुळे सामान्यांची वाहतूककोंडीतून सुटका होणार आहे. विशेष म्हणजे, मुख्यमंत्री भजनलाल शर्मा फक्त सामान्यांप्रमाणे ट्रॅफिकमधून चालणार नाहीत, तर सिग्नल लागल्यावर त्यांची गाडीही थांबवतील. पीएम नरेंद्र मोदीदेखील या व्हीआयपी कल्चरच्या विरोधात आहेत.
पहिल्यांदाच आमदार आणि थेट मुख्यमंत्री...
सांगानेरचे आमदार भजनलाल शर्मा यांचा राजकीय प्रवास खुप रंजक आहे. भाजपने भरतपूरचे रहिवासी भजनलाल शर्मा यांना पहिल्यांदाच जयपूरच्या सांगानेरसारख्या सुरक्षित जागेवरुन निवडणूक लढवायला लावली. पहिल्याच निवडणुकीत भजनलाल शर्मा विजयी झाले आणि पक्षाने त्यांना थेट मुख्यमंत्री केले. यापूर्वी 4 वेळा त्यांनी प्रदेश सरचिटणीस म्हणून काम पाहिले आहे.