राजस्थानमध्ये भीषण गरमी; भारत-पाक बॉर्डरवर 55 डिग्री तापमानात BSF जवानांची देशसेवा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2024 18:38 IST2024-05-26T18:37:20+5:302024-05-26T18:38:14+5:30
तापलेल्या वाळूत जवानांनी भाजले पापड-चपाती, अंडीही उकडली.

राजस्थानमध्ये भीषण गरमी; भारत-पाक बॉर्डरवर 55 डिग्री तापमानात BSF जवानांची देशसेवा...
Summer in Rajasthan : यंदा अतिशय तीव्र उन्हाळा जाणवतोय. उत्तर भारतात तर सूर्य अक्षरशः आग ओकतोय. सर्वत्र इतकी प्रचंड उष्णता आहे की, जीवाची काहिली होत आहे. सरासरी तापमान 45-46 वरच पोहचले आहे. एकीकडे आपल्यासारख्या सामान्यांना हे तापमान सहन होत नाहीये, तर दुसरीकडे पाकिस्तानी सीमेवर आपले वीर जवान 53-55 अंश तापमानात कर्तव्य बजावत आहेत. सध्या राजस्थानच्या जैसलमेरमध्ये तापमान 55 अंशांवर पोहोचले आहे. अशा परिस्थितीतदेखील देशाच्या रक्षणासाठी चोवीस तास सीमेवर उभे आहेत.
राजस्थानमध्ये सध्या प्रचंड उष्णता आहे, संपूर्ण राज्य उष्णतेच्या लाटेने होरपळतोय. भारत-पाकिस्तानच्या पश्चिम सीमेवरील तापमानाने 55 अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला आहे. अलीकडेच सीमेवरील जवानांचे काही व्हिडिओ समोर आले आहेत, ज्यात भारतीय जवान तापलेल्या वाळूत पापड भाजताना, अंडी उकडताना आणि गाडीच्या बोनेटवर पोळी भाजताना दिसत आहेत. अश भीषण गरमीत सीमा सुरक्षा दलातील (बीएसएफ) जवानांच्या हिंमतीपुढे सूर्यदेखील फिका पडल्याचे पाहायला मिळतेय. 55 अंश तापमानातदेखील जवान आपले काम चोख बजावत आहेत.
या भीषण उन्हापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी जवान पूर्णवेळ डोक्यावर टोपी, चेहऱ्यावर रुमाल, डोळ्यावर गॉगल आणि सोबत लिंबू, कांद्यासह पाण्याची बाटली ठेवत आहेत. विशेष म्हणजे, अशा कडक उन्हात बीएसएफच्या महिला जवानदेखील देशासाठी आपले कर्तव्य चोख बजावत आहेत.
शहरातील तापमान 50 च्या जवळ
सीमेवरील तापमान 55 च्या पुढे गेले आहे, तर राजस्तानमधील अनेक शहरातील तापमान 48-50 अंशांच्या जवळ पोहोचले आहे. राजस्थानच्या जैसलमेरमधील तापमान 48-50 डिग्री सेल्सियस, बरीटर 48, जॅलोर 47, जोधपूर 48, गंगानगर 47, कोटा 46, भिलवाडा 45, फतेहपूरमध्ये 45 आणि जयपूरमधील तापमान 47 डिग्री सेल्सिअसवर पोहोचले आहे. उष्णता इतकी आहे की, ती 10 मिनिटे उन्हात थांबलो तरी, शरीर गरमीने वितळून जाईल, अशी परिस्थिती आहे.