रत्नागिरीतील काजळी नदी संवर्धनासाठी हजार वृक्षांची लागवड
By शोभना कांबळे | Published: August 29, 2023 06:22 PM2023-08-29T18:22:34+5:302023-08-29T18:23:23+5:30
चला जाणुया नदीला अभियानांअतर्गत वृक्षारोपण मोहीम यशस्वी
![Plantation of thousand trees for conservation of Kajli River in Ratnagiri | रत्नागिरीतील काजळी नदी संवर्धनासाठी हजार वृक्षांची लागवड Plantation of thousand trees for conservation of Kajli River in Ratnagiri | रत्नागिरीतील काजळी नदी संवर्धनासाठी हजार वृक्षांची लागवड](https://d3pc1xvrcw35tl.cloudfront.net/images/840x630/kajli-nadi_2023081076126.jpg)
रत्नागिरीतील काजळी नदी संवर्धनासाठी हजार वृक्षांची लागवड
रत्नागिरी : जिल्हा प्रशासन समिती सदस्य, कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय लांजा राष्ट्रीय सेवा योजना विभाग, ग्राम पंचायत येरवंडे कणगवली, मौजे येरवंडे महादेव देवस्थान समिती यांच्या संयुक्त विद्यमाने ‘चला जाणुया नदीला’ आणि ‘मेरी मिट्टी मेरा देश’ या उपक्रमांतर्गत काजळी नदी पाणलोट क्षेत्रातील गावांमध्ये हजार वृक्षांची लागवड करण्यात आली.
काजळी नदी संवर्धनासाठी गेल्या वर्षापासून विविध जलप्रेमी व्यक्ती, संस्था प्रयत्न करीत आहेत. याचाच एक भाग म्हणून ‘चला जाणुया नदीला’ आणि ‘मेरी मिट्टी मेरा देश’ या उपक्रमांतर्गत काजळी नदी पाणलोट क्षेत्रातील गावांमध्ये वृक्ष लागवड मोहीम राबविण्यात आली. या अभियानांतर्गत वनविभागाकडून पुरविण्यात आलेली शिवण, बहावा, हरडा, हेला, आवळा, जांभूळ, रिंगी, मोहगणी, दालचिनी, आटकी, करंज, पेरू, बेल,साग, लिंबू, शमी, राताबी, गुलमोहर आदींची एक हजार रोपे गावातील रस्त्यांच्या दुतर्फा आणि देवराई येथे लावण्यात आली.
या अभियानात काजळी नदी प्रहरी जिल्हा समिती सदस्य समन्वयक अनिल कांबळे, समन्वयक रोहन इंगळे, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे जिल्हा समन्वयक डॉ राहुल मराठे, डॉ. महादेव बडगे, प्रा. अवंतिका केळुस्कर, प्रा. अनुप्रिया प्रभू, प्रा. कदम, वनपाल आरेकर, वनरक्षक सूरज तेली, तसेच महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे ९० विद्यार्थी, येरवंडे गावचे ग्रामस्थ या अभियानात सहभागी झाले. या सर्व उपक्रमाला लांजा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए एस कुलकर्णी तसेच उपप्राचार्य डॉ. के आर चव्हाण यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.
चला जाणुया नदीला अभियानात काजळी नदी तीरावरील महसूल गावातून वृक्षारोपण करून नदी काठाचे तसेच डोंगर भागातील धूप थांबविणे, पाणलोट क्षेत्रात भूजल पाणी साठा वाढवणे, फूड फॉरेस्ट संकल्पनेतून वन्य प्राण्यांना विस्थापनापासून थांबवणे, पर्यावरण संवर्धन या हेतुने सर्व पर्यावरप्रेमीं ग्रामस्थांनी वृक्षारोपणाची ही मोहीम यशस्वी केली.