रत्नागिरी : ग्रामसेवक, गटविकास अधिकारी भ्रष्टाचार करतील, शिक्षक नाही : गुलाबराव पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 03:14 PM2018-03-27T15:14:43+5:302018-03-27T15:14:43+5:30
सर्वात नॉन करप्ट कोणी असेल तर तो शिक्षक आहे. कारण त्याच्याकडून भ्रष्टाचार होत नाही. ग्रामसेवक, गटविकास अधिकारी, डीडीआर यांच्याकडून भ्रष्टाचार होईल, पण शिक्षकाकडून होणार नाही, असा विश्वास महाराष्ट्राचे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला.
![Ratnagiri: Gramsevak, Rural development officer will do corruption, not a teacher: Gulabrao Patil | रत्नागिरी : ग्रामसेवक, गटविकास अधिकारी भ्रष्टाचार करतील, शिक्षक नाही : गुलाबराव पाटील Ratnagiri: Gramsevak, Rural development officer will do corruption, not a teacher: Gulabrao Patil | रत्नागिरी : ग्रामसेवक, गटविकास अधिकारी भ्रष्टाचार करतील, शिक्षक नाही : गुलाबराव पाटील](https://d3pc1xvrcw35tl.cloudfront.net/images/840x630/27sindhu_20180371122.jpg)
रत्नागिरी : ग्रामसेवक, गटविकास अधिकारी भ्रष्टाचार करतील, शिक्षक नाही : गुलाबराव पाटील
रत्नागिरी : सर्वात नॉन करप्ट कोणी असेल तर तो शिक्षक आहे. कारण त्याच्याकडून भ्रष्टाचार होत नाही. ग्रामसेवक, गटविकास अधिकारी, डीडीआर यांच्याकडून भ्रष्टाचार होईल, पण शिक्षकाकडून होणार नाही, असा विश्वास महाराष्ट्राचे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला.
सहकार राज्यमंत्री पाटील हे रत्नागिरी जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढीच्या आरोग्य मंदिर येथे उभारण्यात आलेल्या नूतन वास्तूचे उद्घाटन सोहळ्यात बोलत होते. यावेळी ते पुढे म्हणाले की, शिक्षक हा देवता आहे.
निवडणुकीत पोस्टलमध्ये मला सर्वात जास्त मते शिक्षकांची मिळतात, याचे कारण शिक्षक हा देवता आहे. पूर्वीच्या काळी मुलाने सांगितले शिक्षकाने मारले तर बाप काठी घेऊन जायचा आणि शिक्षकांना सांगायचा अजून मारा. आज तो शिक्षक आहे की नाही, हे मला माहीत नाही.
ते पुढे म्हणाले की, येथे १०० टक्के गॅरंटी आहे की पगारामध्येच कटींग आहे. त्यामुळे शून्य टक्के थकबाकी आहे. बेटी बचाओ, बेटी पढाओ म्हणण्यापेक्षा तिच्या लग्नाला ५००० रुपये मदत केली तर हा सभासद तुमचा ऋणी राहील. त्याला वाटेल की ही संस्था माझ्या मागे उभी आहे. तुमच्या संस्थेकडून एखादा दवाखाना येथे उभा करावा. साडेतीन तासात कोल्हापूरला जाणाऱ्या रुग्णाचा जीव येथेच वाचला तर ती पुण्याई तुम्हाला मिळणार आहे.
६० कोटींमध्ये हा दवाखाना उभा राहिला तर तेथे शिक्षकांचीच मुले डॉक्टर म्हणून ठेवा. महामार्गावर कितीतरी लोक अपघातात जीव गमावतात. त्यामुळे तुम्ही दवाखाना उभारलात तर मला वाटेल की, मी या कार्यक्रमाला आल्याचे सार्थक झाले. यासाठी मी तुमच्या पाठीशी उभा आहे, असा दिलासा पाटील यांनी दिला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी पतसंस्थेचे अध्यक्ष दिलीप महाडिक होते. यावेळी खासदार विनायक राऊत, आमदार उदय सामंत, जिल्हा उपनिबंधक बकुळा माळी, उपाध्यक्ष अनंत कदम, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक, तालुकाध्यक्ष बंड्या साळवी, संचालक दिलीप देवळेकर उपस्थित होते.
आमदार, खासदारांवर स्तुतीसुमने
सर्वात जास्त योजना आणणारे कोणी आमदार असेतील तर ते उदय सामंत आहेत. तर सर्वात गोड बोलणारे आणि सर्वात जास्त संपर्क ठेवणारे या देशातले खासदार असतील तर ते विनायक राऊत आहेत.
बरेचवेळा खासदार सापडत नाहीत. दिल्ली टू गल्ली हा विषय संपतो. पण आमचे राऊत बघा गोड बोलणार, चांगलं बोलणार, अधिकाऱ्यांचा सन्मान करणार. पण आज आपण भलत्याच लोकांसमोर आलोय. हे लोक आपल्याला निवडून आणण्याची ताकद ठेवतात व पाडण्याचीही. ते जे ठरवतात, तो कार्यक्रम क्लियर असतो.
शेतकऱ्याचा मुलगा-मुलगी कलेक्टर होणे कौतुकास्पद
जेथे पैसे देण्याची दानत आहे तेथे नोटा घेऊन लोकं उभी आहेत. साईबाबांच्या मंदिरात लोक नोटा का टाकतात. तेथे देवच सुंदर आहे. देव लक्ष ठेवतो सर्वांवर. गुलाबरावांचा, राऊत साहेबांचा, सामंत साहेबांची मुलं एमपीएसस्सी, युपीएसस्सी झाली मोठे कौतुक नाही. मुलांना घडवणाऱ्या शिक्षकाचा, शेतकऱ्याचा मुलगा-मुलगी कलेक्टर होणे कौतुकास्पद असल्याचे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले.