तंबाखूजन्य पदार्थांची विक्री, रत्नागिरीत ४४ दुकानदारांवर दंडात्मक कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2021 15:24 IST2021-01-05T15:22:29+5:302021-01-05T15:24:37+5:30
Tobacco Ban Ratnagiri- रत्नागिरी शहरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या टपऱ्या आणि दुकानांवर सोमवारी सकाळी अचानक धाड टाकण्यात आली. या धाडीमध्ये ४४ टपरीधारक व दुकानदारांवर कारवाई करत त्यांच्याकडून ३० हजार ४०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

तंबाखूजन्य पदार्थांची विक्री, रत्नागिरीत ४४ दुकानदारांवर दंडात्मक कारवाई
रत्नागिरी : शहरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या टपऱ्या आणि दुकानांवर सोमवारी सकाळी अचानक धाड टाकण्यात आली. या धाडीमध्ये ४४ टपरीधारक व दुकानदारांवर कारवाई करत त्यांच्याकडून ३० हजार ४०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हा रुग्णालय, अन्न व औषध प्रशासन आणि रत्नागिरी शहर पोलीस स्थानक यांच्या संयुक्त भरारी पथकाने ही कारवाई केली. या पथकाने शहरात अचानक छापा टाकून दुकानदारांची झडती घेण्यास सुरुवात केली.
या तपासणीमध्ये काही दुकानदार दोषी आढळले असून, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. या कारवाईनंतर शहरातील टपरीधारक आणि दुकानदारांचे धाबे दणाणले आहेत. सिगारेट व अन्न तंबाखूजन्य उत्पादने (जाहिरात, मनाई आणि व्यापार व वाणिज्य उत्पादन आणि वितरण नियमन) कायदा २००३ (कोटपा कायदा २००३) अन्वये तंबाखूजन्य पदार्थांची विक्री केल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली.
ही कारवाई जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संघमित्रा फुले-गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या भरारीपथकात अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक सई धुरी, समुपदेशक प्राची आशिष भोसले, सामाजिक कार्यकर्ते सचिन भरणे, अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी प्रशांत गुंजाळ, दशरथ बांभळे, पोलीस कॉन्स्टेबल रिशिता गावकर, पोलीसनाईक प्रवीण वीर व सहकारी मिलिंद कदम यांचा समावेश होता.