konkan tourism: तारकर्ली बोट दुर्घटना; कोकणचा दोष काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2022 05:36 PM2022-05-31T17:36:21+5:302022-05-31T17:49:34+5:30

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तारकर्ली येथील बाेट दुर्घटनेनंतर अनेकांनी संपूर्ण काेकणच असुरक्षित असल्याचे भासवण्यास सुरुवात केली. अनेकांच्या लेखण्यांनी शाई संपेपर्यंत काेकणच्या पर्यटनाचे अवगुण दाखविण्याचा प्रयत्न केला. केवळ सिंधुदुर्ग म्हणजेच काेकण, असे समजून संपूर्ण काेकणातील पर्यटनस्थळे कशी असुरक्षित आहेत, हेच जणू भासविण्याचा प्रयत्न करण्यात आला.

Tarkarli boat accident: What is the fault of Konkan | konkan tourism: तारकर्ली बोट दुर्घटना; कोकणचा दोष काय?

konkan tourism: तारकर्ली बोट दुर्घटना; कोकणचा दोष काय?

Next

- अरुण आडिवरेकर

कोकण म्हटलं की, झर्रकन डाेळ्यासमाेर येताे ताे म्हणजे काेकणातील अथांग समुद्र... निळ्याशार दूरवर दिसणाऱ्या या समुद्राची भुरळ अनेकांना पडते. त्यामुळेच की काय, काेकणात आल्यानंतर अनेकांना समुद्राच्या पाण्याशी खेळण्याचा माेह अधिक हाेताे. आजवर कधीही न पाहिलेला समुद्र पाहिल्यानंतर बंदिस्त तलावात पाेहणाऱ्यांना त्याचे अप्रूप वाटते. त्यामुळेच पर्यटनासाठी येणाऱ्यांपैकी अनेकजण पर्यटनापेक्षा समुद्रात डुंबण्याचाच आनंद लुटतात. काेकणच्या निसर्गाने आजवर अनेकांना भुरळ घातली आहे. त्यामुळेच काेकणात येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत दिवसागणिक वाढ हाेत आहे. काेकणात येणाऱ्या पर्यटकांचे तितक्याच आत्मियतेने काेकणवासीय आदरातिथ्य करतात, म्हणूनच याठिकाणी येणाऱ्या प्रत्येकाला काेकण आपलेसे वाटते.

पण, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तारकर्ली येथील बाेट दुर्घटनेनंतर अनेकांनी संपूर्ण काेकणच असुरक्षित असल्याचे भासवण्यास सुरुवात केली. अनेकांच्या लेखण्यांनी शाई संपेपर्यंत काेकणच्या पर्यटनाचे अवगुण दाखविण्याचा प्रयत्न केला. केवळ सिंधुदुर्ग म्हणजेच काेकण, असे समजून संपूर्ण काेकणातील पर्यटनस्थळे कशी असुरक्षित आहेत, हेच जणू भासविण्याचा प्रयत्न करण्यात आला. तारकर्ली येथे काही प्रमाणात त्रुटी राहिल्या असतील, पण त्यामुळे संपूर्ण काेकणच असुरक्षित आहे, काेकण ‘आपले नसाच’ असे म्हणणे चुकीचे आहे.

रत्नागिरी जिल्हाही याच काेकणात येताे. याच रत्नागिरीमध्ये श्रीक्षेत्र गणपतीपुळे येते. गणपतीपुळे येथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या काही कमी नाही. त्याचबराेबर तेथे घडलेल्या दुर्घटनाही कमी नाहीत. याठिकाणी सुरक्षेच्यादृष्टीने सुरक्षा रक्षक आहेत, लाईफ जॅकेट आहेत, धाेक्याच्या ठिकाणी लाल रिबीनही बांधण्यात आली हाेती, सूचना फलकही आहेत, तरीही दुर्घटना घडतच आहेत. याला कारण पर्यटकांचा आततायीपणा कारणीभूत आहे. ज्यांना समुद्राची खाेलीही माहीत नाही, अशा पर्यटकांना स्थानिक सावधानतेच्याही सूचना देतात. पण, आपणच सर्वज्ञानी असल्याच्या आविर्भावात पर्यटक पाण्यात उतरतात आणि मग दुर्घटना घडतात. गणपतीपुळे येथे पर्यटकांसाठी धाेक्याची सूचना देणारा भलामाेठा फलक लावण्यात आला आहे. पण, आपण इतके पुढारलेले आहाेत की, या अशा फलकांकडे लक्ष का द्यायचे? त्याकडे दुर्लक्ष करून समुद्राच्या पाण्यात उतरायचे आणि मनसाेक्त डुंबायचे, एवढेच माहीत आहे.
त्यावेळी दुर्घटना घडली की, दाेष काेकणालाच !

काेकणात येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेची जबाबदारी जेवढी व्यवस्थेची आहे, तेवढीच येणाऱ्या पर्यटकांचीही आहेच ना? पुरेशी सुरक्षा असूनही दुर्घटना थांबलेल्या नाहीत. याचे कारण पर्यटकांचा अतिउत्साह आणि मस्ती हेच आहे. तलावात नाही तर स्वीमिंग पूलमध्ये पाेहणाऱ्यांनी समुद्राच्या अथांगतेची परीक्षा का घ्यावी?  ज्या समुद्राची आपल्याला ओळख नाही, पाण्याचा अंदाज नाही, अशा समुद्राच्या पाण्यात खाेलवर जाऊन मस्ती करण्याचे प्रयाेजनच काय? किनाऱ्यावरूनही समुद्राच्या लाटांचा, त्याच्या अथांगतेचा आनंद घेता येताेच ना! त्यासाठी पाण्यातच उतरायला हवे असे काेठे आहे. पाण्याची सफर करताना अंगात लाईफ जॅकेट न घालताही उतरणारे महाभाग असतातच. त्यांच्या चुकीचे टीकास्त्र काेकणावर का? काेकणात पर्यटनासाठी येणाऱ्यांनी स्वत:ची जरी सुरक्षा पाहिली तरी, दुर्घटनांचे प्रमाण कमी हाेईल, हे नक्की.

Web Title: Tarkarli boat accident: What is the fault of Konkan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.