सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीकविम्याची १३८ कोटींची भरपाई

By अशोक डोंबाळे | Published: July 6, 2024 06:48 PM2024-07-06T18:48:05+5:302024-07-06T18:48:23+5:30

सव्वातीन लाखांवर लाभार्थी : गेल्यावर्षीच्या खरीप हंगामासाठी मदत

138 crore crop insurance compensation to farmers in Sangli district | सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीकविम्याची १३८ कोटींची भरपाई

सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीकविम्याची १३८ कोटींची भरपाई

सांगली : जिल्ह्यात गेल्यावर्षी पर्जन्यमान कमी झाले होते. त्यामुळे खरीप हंगामाला फटका बसला होता. यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत जिल्ह्यातील तीन लाख ३९ हजार शेतकऱ्यांना १३८ कोटी रुपयांची भरपाई मिळाली आहे. ही रक्कम संबंधितांच्या बँक खात्यावरही वर्ग झालेत. गेल्या चार वर्षातील सर्वाधिक भरपाई आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या पेरणीसाठी मोठा दिलासा मिळालेला आहे.

शेतकऱ्यांना शेती करताना विविध संकटांचा सामना करावा लागतो. यासाठी पीक विमा योजना सुरू करण्यात आलेली आहे. यामध्ये अतिवृष्टी, दुष्काळ, गारपीट, पावसातील खंड, ढगफुटी, चक्रीवादळ आदी कारणाने पिकांचे नुकसान झाल्यास विमा उतरविलेल्या पिकांसाठी भरपाई देण्यात येते. यासाठी पूर्वी शेतकऱ्यांना ठराविक रक्कम भरावी लागत होती. तर राज्य आणि केंद्र शासन बाकीचा भार उचलत होते.

मात्र, गेल्यावर्षीपासून राज्य शासनाने शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा योजना सुरू केली. शेतकरी एक रुपया भरून योजनेत समाविष्ट होत आहेत. त्यामुळे गेल्यावर्षी खरीप हंगामात एक रुपयाची योजना सुरू झाल्यानंतर सातारा जिल्ह्यातील पावणेतीन लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता.

जिल्ह्यात गेल्यावर्षी पर्जन्यमान कमी झाले होते. पावसाच्या वार्षिक सरासरीनेही १०० टक्क्यांचा पल्ला गाठला नव्हता. तसेच सर्वच तालुक्यात पाऊस कमी होता. यामुळे खरीप हंगामातील पिकांना फटका बसलेला. त्यामुळे पंतप्रधान पीक विमा योजनेत सहभाग घेतलेल्या शेतकऱ्यांना भरपाई मिळत आहे. जिल्ह्यातील दोन लाख ६० हजार शेतकऱ्यांना पीक नुकसान भरपाईपोटी ११७ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. विविध पिकांच्या नुकसानीसाठी ही भरपाई रक्कम देण्यात येणार आहे. त्यामुळे पीक विमा योजनेचा जिल्ह्यातील तीन लाखाहून अधिक शेतकऱ्यांना मोठा फायदा झाल्याचे दिसून येत आहे.

चार वर्षांतील सर्वाधिक मोठी भरपाई

जिल्ह्यात मागील काही वर्षांपासून पीक विमा योजना राबविण्यात येत आहे. यामध्ये २०२३ मधील खरीप हंगामातील पिकांच्या नुकसानीपोटी मिळणारी रक्कम सर्वाधिक आहे. २०२०-२१ या वर्षात एक हजार दोन शेतकऱ्यांना ३३ लाख रुपये मिळाले. २०२१-२२ या वर्षात एक हजार ७७७ शेतकऱ्यांना एक कोटी चार लाख रुपये मिळाले होते. २०२२-२३ वर्षात दोन हजार २३३ शेतकऱ्यांना दोन काेटी २४ लाख रुपयांची भरपाई मिळालेली होती. २०२३ च्या खरीप हंगामात तीन लाख ७७ हजार शेतकरी विमाधारक होते. त्यातील तीन लाख ३९ हजार शेतकऱ्यांना १३८ कोटी मिळणार आहेत.

निसर्गाचा लहरीपणा वारंवार अनुभवास येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी प्रतिकूल परिस्थितीत होणाऱ्या नुकसानीसाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभाग घ्यावा. यासाठी एक रुपया भरावा लागणार आहे. गेल्यावर्षी खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता. यावर्षीही शेतकऱ्यांनी या योजनेत १५ जुलैपूर्वी जास्तीत जास्त सहभाग घ्यावा. -विवेक कुंभार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सांगली.

Web Title: 138 crore crop insurance compensation to farmers in Sangli district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.