भूकंपाचा केंद्रबिंदू हळूहळू सरकतोय वारणा खोऱ्यात

By admin | Published: June 4, 2017 10:46 PM2017-06-04T22:46:59+5:302017-06-04T22:46:59+5:30

भूकंपाचा केंद्रबिंदू हळूहळू सरकतोय वारणा खोऱ्यात

The center of the earthquake slowly moves into the valley of Varna | भूकंपाचा केंद्रबिंदू हळूहळू सरकतोय वारणा खोऱ्यात

भूकंपाचा केंद्रबिंदू हळूहळू सरकतोय वारणा खोऱ्यात

Next


संजय पाटील ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कऱ्हाड : कोयना विभागात गेल्या दहा वर्षांत तब्बल ६ हजार ८८२ भूकंप ‘किर्णास’ वेधशाळेत नोंदवले गेलेत. त्यापैकी बहुतांश भूकंपांचा केंद्रबिंदू वारणा खोऱ्यात असल्याचे समोर आले आहे.
या विभागात १९६७ मध्ये ६.६ रिश्टर स्केलचा शक्तीशाली भूकंप झाला. या भूकंपाने मोठ्या प्रमाणात जिवीत तसेच वित्तहानी झाली. त्यानंतर आजपर्यंत या विभागात एवढ्या मोठ्या तिव्रतेचा भूकंप झाला नसला तरी लहानमोठे हजारो धक्के दरवर्षी या विभागाला बसतायत.
महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी समजल्या जाणाऱ्या कोयना धरणाची निर्मिती झाल्यानंतर सुरक्षिततेच्या दृष्टीने येथे ‘किर्णास’ भूकंपमापन वेधशाळा उभारण्यात आली. राज्य शासनाच्या अखत्यारीत असलेल्या या वेधशाळेत प्रादेशिक भूकंपांची नोंद घेतली जाते. वास्तविक येथे प्रादेशिकसह देशभरातील सर्वच भूकंप समजतात. मात्र, नोंद फक्त प्रादेशिक विभागातीलच घेतली जाते. या वेधशाळेतील नोंदीनुसार गेल्या दहा वर्षांत विभागामध्ये ६ हजार ८८२ भूकंपांची नोंद झाली आहे. या भूकंपांचा केंद्रबिंदू कोयना तसेच वारणा खोऱ्यामध्ये आहे. मात्र, कोयना खोऱ्यात केंद्रबिंदू असलेल्या भूकंपांपेक्षा वारणा खोऱ्यात केंद्रबिंदू असलेल्या भूकंपांची संख्या अधिक असल्याचे समोर आले आहे. तसेच वारणा खोऱ्यात केंद्रबिंदू असलेल्या भूकंपांची तिव्रताही जास्त असल्याचे त्या त्या वेळच्या नोंदीवरून दिसून येत आहे.
सांगली जिल्ह्यातील चांदोली व कोयना विभागात खऱ्या अर्थाने भूकंपांची मालिका ११ डिसेंबर १९६७ पासून सुरू झाली. तेव्हापासून या दोन्ही खोऱ्यांना हजारो धक्के बसलेत. रिश्टर स्केलवर या धक्क्यांची तिव्रता कधी ३ तर कधी ५ पर्यंत नोंदली गेली आहे. किर्णास वेधशाळेत नोंद झालेल्या भूकंपांपैकी गत काही वर्षातील मोठ्या भूकंपांचा केंद्रबिंदू वारणा खोऱ्यात आहे. केंद्रबिंदू वारणा खोऱ्याकडे सरकण्याचे भौगोलिक कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी गत अनेक वर्षापासून भूगर्भ तज्ञांकडून त्याची कारणमिमांसा करण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी कऱ्हाडसह कोयना व चांदोली विभागात अभ्यासही सुरू आहे. किर्णासच्या नोंदीनुसार गत दहा वर्षात झालेल्या भूकंपांपैकी एकच भुकंप ५ रिश्टर स्केलपर्यंत नोंदला गेला. हा भूकंप २०१२ मध्ये झाला होता. तसेच त्याचा केंद्रबिंदू वारणा खोऱ्यात होता. या भुकंपाने त्यावेळी काही वित्तहानी झाली होती. मात्र, त्यानंतर ५ रिश्टर स्केलपेक्षा जास्त तिव्रतेचा भुकंप झालेला नाही.

सलग तीन वर्ष
प्रमाण कमी
२००९ सालापासून भुकंपाची संख्या काही प्रमाणात कमी झाली. २००९ साली तीन रिश्टर स्केलपर्यंतचे ८०९, तीन ते चार रिश्टर स्केलपर्यंतचे ११ तर चार ते पाच रिश्टर स्केलपर्यंतचे ३ असे एकुण ८२३, २०१० साली तीन रिश्टर स्केलपर्यंतचे ८१०, तीन ते चार रिश्टर स्केलपर्यंतचे १६ असे एकुण ८२६, २०११ साली तीन रिश्टर स्केलपर्यंतचे ६१०, तीन ते चार रिश्टर स्केलपर्यंतचे ८ असे एकुण ६१८ भुकंप झाले.
२००७ मध्ये सर्वाधिक धक्के
किर्णास वेधशाळेतील नोंदीनुसार गत दहा वर्षांमध्ये २००७ मध्ये सर्वात जास्त भूकंपाचे धक्के बसले. २००७ साली तीन रिश्टर स्केलपर्यंतचे १ हजार २५३, तीन ते चार रिश्टर स्केलपर्यंतचे १३ तर चार ते पाच रिश्टर स्केलपर्यंतचे ३ असे एकुण १ हजार २६९ भुकंप झाले. २००८ सालीही तीन रिश्टर स्केलपर्यंतचे १ हजार १११, तीन ते चार रिश्टर स्केलपर्यंतचे ७ तर चार ते पाच रिश्टर स्केलपर्यंतचे २ असे एकुण १ हजार १२० भुकंप झाले होते.
२०१६ फक्त २७ भूकंप
कोयना, चांदोली विभागात २०१२ साली तीन रिश्टर स्केलपर्यंतचे १ हजार १३६, तीन ते चार रिश्टर स्केलपर्यंतचे ३ तर सहा रिश्टर स्केलपर्यंतचा १ असे एकुण १ हजार १४०, २०१३ साली तीन रिश्टर स्केलपर्यंतचे ३९६, तीन ते चार रिश्टर स्केलपर्यंतचे ६ तर चार ते पाच रिश्टर स्केलपर्यंतचे १ असे एकुण ४०३, २०१४ साली तीन रिश्टर स्केलपर्यंतचे ४००, तीन ते चार रिश्टर स्केलपर्यंतचे २ असे एकुण ४०२, २०१५ साली तीन रिश्टर स्केलपर्यंतचे २५०, तीन ते चार रिश्टर स्केलपर्यंतचे ३ असे एकुण २५३ आणि २०१६ साली तीन रिश्टर स्केलपर्यंतचे २०, तीन ते चार रिश्टर स्केलपर्यंतचे ६ तर चार ते पाच रिश्टर स्केलपर्यंतचे १ असे एकुण २७ भुकंप झाले आहेत.
हेळवाकपासून सुरू होते वारणा खोरे
कोयना नदी हेळवाकपर्यंत येऊन तेथून ९० अंशामध्ये कऱ्हाडकडे वळते. तेथून दक्षिणेकडील भाग हा वारणा खोरे म्हणून ओळखला जाता. या खोऱ्यामध्ये चांदोलीचा भाग समाविष्ट आहे. मळे, कोळणे, पाथरपुंज, नाव, मोरगिरी खोरे, चांदोली, सिद्धेश्वर, चांदेल, पांढरपाणी ही गावे वारणा खोऱ्यात येतात. कोयना आणि वारणा खोरे नजीक असल्याने दोन्हीपैकी कोणत्याही खोऱ्यात भुकंप झाला तरी त्याची तिव्रता कमी-अधिक प्रमाणात दोन्ही खोऱ्यांमध्ये जाणवते.

Web Title: The center of the earthquake slowly moves into the valley of Varna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.