चांदोलीचा पर्यटन विकास आराखडा रखडला

By admin | Published: June 4, 2017 11:02 PM2017-06-04T23:02:36+5:302017-06-04T23:02:36+5:30

चांदोलीचा पर्यटन विकास आराखडा रखडला

Chandoli Tourism Development Plan Stops | चांदोलीचा पर्यटन विकास आराखडा रखडला

चांदोलीचा पर्यटन विकास आराखडा रखडला

Next


विकास शहा ।
लोकमत न्यूज नेटवर्क
शिराळा : चांदोलीचा पर्यटन विकास होणार...पर्यटन विकास होणार असे १९८५ पासून सांगण्यात येते; मात्र जो पर्यटन विकास व्हायला पाहिजे, तो अद्याप झालेला नाही. त्यामुळे निसर्गाचा अनमोल ठेवा असणारे चांदोली अद्यापही पाहायला पर्यटकांना अडचणीचे होत आहे.
चांदोली अभयारण्यातील हिरवीगार वनराई, सह्याद्रीच्या पर्वतरांगा, वसंतसागर जलाशय, विविध औषधी वनस्पतींचे माहेरघर, वन्यप्राणी असे येथील निसर्गसौंदर्य. या सर्व बाबींचा विचार करून शासनाने १९८५ मध्ये हा परिसर चांदोली अभयारण्य म्हणून घोषित केला; मात्र तब्बल ३२ वर्षे झाली तरीही ज्या पध्दतीने या परिसराचा पर्यटन क्षेत्र विकास व्हायला पाहिजे होता तसा झालेला नाही. दळणवळणासाठी मुख्य रस्त्याची गरज, मात्र अपुरे रस्ते, वाहनांचा तुटवडा, मनुष्यबळाची कमतरता, रखडलेले पुनर्वसन अशा विविध समस्या आजही जाणवत आहेत.
जुलै २०१२ मध्ये ‘युनेस्को’ने या परिसराचा जागतिक वारसा यादीत समावेश केला. त्यामुळे हे उद्यान जगाच्या नकाशात झळकू लागले आहे. जैवविविधतेने नटलेल्या या उद्यानात पक्ष्यांच्या विविध प्रजाती, सरपटणारे प्राणी, उभयचर प्राणी, फुलपाखरे, प्राण्यांच्या विविध प्रजाती आढळतात. औषधी वनस्पतींचे माहेरघर म्हणून या उद्यानाची ओळख आहे.
सोमवारी येथे पर्यटनाचा सुटीचा दिवस असतो. मंगळवार ते रविवार या सहा दिवसांत पर्यटकांना उद्यानात सोडले जाते. माणसी ३० रुपये, चारचाकी वाहनांचे १५० रुपये व गाईडचे ३०० रुपये पर्यटकांना मोजावे लागतात. बिबटे, गवे, अस्वल, रानडुक्कर, सांबर, भेकर, गेंडा, साळींदर, वानर, माकड, उदमांजर, शेकरू, ससा, खवले मांजर, मुंगूस तसेच वाघाचेही येथे अस्तित्व आहे. या प्राण्यांचे दर्शन व्हावे म्हणून पर्यटक येतात; मात्र पर्यटकांना दर्शन होत नाही. याचे कारण अभयारण्याचे मोठ्या प्रमाणात असणारे विस्तारित क्षेत्र, फार कमी वेळ उद्यानात थांबण्याचा वनविभागाने दिलेला परवाना, याचबरोबर वन्यप्राणी सायंकाळी बाहेर पडतात, त्याचवेळी पर्यटकांनाही अभयारण्याबाहेर जावे लागते. वन्य विभागाकडून कोणत्याही वाहनाची सोय होत नाही. त्याचबरोबर दुचाकी वाहनांना उद्यानात प्रवेश नसल्याने पर्यटकांना अभयारण्य न पाहताच परतावे लागते.
तत्कालीन जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी चांदोली धरणाच्या जलाशयता नौकाविहार, वनक्षेत्रात वन सफारीची योजना राबविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तत्कालीन तहसीलदार विजया यादव यांची यासाठी नेमणूकही केली होती. मात्र कुशवाह यांची बदली झाली आणि हे काम थांबले. सध्याचे जिल्हाधिकारी शेखर गायकवाड हे सकारात्मक आहेत. चांदोली विश्रामगृहावर सर्व खात्यांची बैठक घेऊन नौकाविहाराची चाचणी घेण्यात आली. मात्र त्यापुढे काही नाही घडले. पर्यटन विकास महामंडळाची फार मोठी जबाबदारी येथे गरजेची आहे. पर्यटकांना राहणे, भोजन, संरक्षण व्यवस्था याबाबत सोयी होणे गरजेचे आहे.
विद्यमान आमदार शिवाजीराव नाईक, माजी आमदार मानसिंगराव नाईक, विधानपरिषद माजी सभापती आमदार शिवाजीराव देशमुख यांनी वारंवार पाठपुरावा करून, अभयारण्याभोवती संरक्षक भिंत उभी करावी, ताडोबाच्या धर्तीवर जीप सफारी व्यवस्था व्हावी, नौकाविहार चालू करावा, चांदोली धरणाच्या पुढील मोकळ्या भागात पैठणच्या धर्तीवर उद्यान व्हावे, गुढे-पाचगणी पठार विकास, पर्यटन विकास व तात्पुरते रोजगार विकास यासाठी ते आग्रही राहिले आहेत. मात्र शासनाकडून वेगाने याबाबत हालचाली होताना दिसत नाहीत.
धनधांडग्यांनी जमिनी घेतल्या
याठिकाणी पर्यटनस्थळ होईल, यामुळे धनधांडग्यांनी अल्प दरात जमिनी खरेदी करून ठेवल्या आहेत. याठिकाणी तातडीने पर्यटनस्थळ शासनाने विकसित करावे, त्यासाठी निधी, तसेच येथील नागरिकांसाठी विकासाचे दालन उघडावे, अशी मागणी होत आहे.
तत्कालीन जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी जलाशयात नौकाविहार, वन सफारीची योजना राबविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तत्कालीन तहसीलदार विजया यादव यांची यासाठी नेमणूकही केली होती. मात्र कुशवाह यांची बदली झाली आणि हे काम थांबले.

Web Title: Chandoli Tourism Development Plan Stops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.