धुराडी बंद, तरीही ‘एफआरपी’ नाही..!

By admin | Published: April 10, 2016 12:24 AM2016-04-10T00:24:28+5:302016-04-10T00:24:28+5:30

शेतकरी चिंतेत : जिल्ह्यात ७७ लाख टन उसाचे गाळप, ९४ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन

Close the chimney, still not 'FRP' ..! | धुराडी बंद, तरीही ‘एफआरपी’ नाही..!

धुराडी बंद, तरीही ‘एफआरपी’ नाही..!

Next

अशोक डोंबाळे सांगली
जिल्ह्यात १६ साखर कारखान्यांनी ७८ लाख ६६ हजार ४८० टन उसाचे गाळप करून ९४ लाख ४८ हजार ५०३ क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. बहुतांशी साखर कारखान्यांची धुराडी बंद झाली असून, पहिला हप्ता प्रतिटन २००० ते २२०० रूपयांप्रमाणे शेतकऱ्यांना मिळाला आहे. परंतु, दुसरा हप्ता विश्वास कारखाना वगळता कोणीही दिलेला नाही. साखरेचे दर वाढूनही दुसरा हप्ता देण्यासाठी कारखानदारांकडून विलंब का केला जात आहे, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
जिल्ह्यातील विश्वास (शिराळा), वसंतदादा (सांगली), हुतात्मा (वाळवा) या तीन साखर कारखान्यांनी विक्रमी उसाचे गाळप केले आहे. राजारामबापू साखराळे शाखेचे २०१४-१५ या वर्षाचे गाळप नऊ लाख सात हजार ४९२ टन होऊन साखर उत्पादन ११ लाख ७४ हजार क्विंटल झाले होते. २०१५-१६ यावर्षी आठ लाख १५ हजार २६९ टन ऊस गाळप होऊन १० लाख ५२ हजार ६०० क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. मागील गळीत हंगामाच्या तुलनेत यंदा एक लाख टन उसाचे गाळप कमी झाले आहे. उर्वरित साखर कारखान्यांनी मागील हंगामाएवढेच गाळप करून हंगाम बंद केले आहेत. सरासरी उताऱ्यात मात्र अर्धा ते एक टक्का घट झाल्याचे दिसत आहे. उतारा घटण्यामागे उन्हाळ्याच्या तीव्रतेचे कारण सांगितले जाते.
जिल्ह्यात १६ साखर कारखान्यांनी २०१४-१५ या वर्षात ७७ लाख ४३ हजार ४३२ टन उसाचे गाळप करून ९४ लाख ७४ हजार ५०३ क्विंटल साखर उत्पादित केली होती. सरासरी साखर उतारा १२़२४ टक्के होता. यावर्षी ७८ लाख ६६ हजार ४८० टन उसाचे गाळप करून ९४ लाख ४८ हजार ५०३ क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. सरासरी उतारा १२.१९ टक्केपर्यंत आहे. काही साखर कारखान्यांचे कमी गाळप झाले असले तरी, काही कारखान्यांनी गाळप क्षमता वाढविल्यामुळे, मागील हंगामाएवढीच साखर जिल्ह्यात उपलब्ध झाली आहे.
सध्या बहुतांशी साखर कारखान्यांनी धुराडी बंद केली आहेत. पहिला हप्ता कारखान्यांनी दिला आहे. पण, दुसऱ्या हप्त्याची बिले दिली नाहीत. शेतकरी संघटना म्हणतात, कायद्यानुसार एफआरपीचे बिल ऊस गाळपास गेल्यापासून चौदा दिवसात मिळाले पाहिजे. प्रत्यक्षात कारखान्यांनी हंगाम बंद केले तरीही, विश्वास कारखाना वगळता कुणीही दुसरा हप्ता दिलेला नाही. विश्वास कारखान्याची एफआरपी प्रतिटन २४८० आहे. त्यानुसार पहिला हप्ता दोन हजाराचा देऊन दुसरा हप्ता ५०० रूपयांचा दिला आहे. वसंतदादा कारखान्याची १९८७ एफआरपी असल्यामुळे त्यांनी प्रतिटन २००० रूपयेप्रमाणे बिल दिले आहे. असे असले तरी, त्यांनी दि. १५ डिसेंबरपासून गाळपास आलेल्या उसाची बिले दिलेली नाहीत.
जिल्ह्यातील कारखान्यांचे गाळप व उत्पादित साखर
कारखाना ऊस गाळप साखर उतारा
वसंतदादा ६३२००० ६७५००० ११.१०
राजारामबापू (साखराळे) ८१५२६९ १०५२६०० १२.९०
विश्वास ५४७५९० ६४२१३० ११.७५
हुतात्मा ७००००० ९१२५०० १३.१९
माणगंगा १७२६६८ १७७००० १०.३५
महांकाली २५७६४० २६९६३० १०.८३
राजारामबापू (वाटेगाव) ५४०८८६ ६९३२०० १२.८५
सोनहिरा ६९२५६२ ८७२२०६ १२.६२
क्रांती ८४६२२४ १०५६९३० १२.५०
सर्वोदय ४४१७७६ ५७५४०० १३.००
मोहनराव शिंदे ४३०४२५ ५१७७०० १२.००
डफळे २७८६४० ३०१५०० १०.८२
यशवंत (गणपती संघ) १६७००० १८०००० १०.७८
केन अ‍ॅग्रो ५५०००० ५८०००० ११़६०
उदगिरी शुगर ४२७८०० ५२७७०७ ११.७९
सद्गुरु श्री श्री शुगर ३६६००० ४१५००० ११़०४
एकूण ७८६६४८० ९४४८५०३ १२़२४
(ऊस गाळप मेट्रिक टनात, तर साखर उत्पादन क्विंटलमध्ये आहे)

Web Title: Close the chimney, still not 'FRP' ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.