आवंढीत श्वानाच्या हल्ल्यातील मृत जनावरांची संख्या २७ वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 07:19 AM2021-02-05T07:19:47+5:302021-02-05T07:19:47+5:30
शेगाव : आवंढी (ता. जत) येथे पिसाळलेल्या श्वानाने चावा घेतल्याने एकूण २४ शेतकऱ्यांची २७ जनावरे दगावली आहेत. ...
शेगाव : आवंढी (ता. जत) येथे पिसाळलेल्या श्वानाने चावा घेतल्याने एकूण २४ शेतकऱ्यांची २७ जनावरे दगावली आहेत. ३१ डिसेंबरपासून या पिसाळलेल्या मोकाट श्वानांनी परिसरात धुमाकूळ घातला आहे. दरम्यान, जतचे तालुका पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विष्णू जवणे, डॉ. स्वप्नील सोनार, डॉ. समाधान नरळे व इतर डॉक्टरांनी साेमवारी आवंढी येथे भेट दिली. तालुक्यात १ जानेवारीपासून रेबिजचे लसीकरण सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
आवंढी येथे ३१ डिसेंबरपासून पिसाळलेल्या कुत्र्यांनी धुमाकूळ घातला आहे. याबाबत परिसरातील शेतकऱ्यांनी पशुवैद्यकीय डॉक्टरांना माहिती दिली. त्यानुसार लसीकरण सुरू करण्यात आले आहे. मात्र लसीकरण हे चार टप्प्यात व ठराविक दिवसात असल्याने आजार बरा होण्यास वेळ लागत आहे. दरम्यान, आवंढी ग्रामपंचायतीने एक पत्र जत पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागाला दिले आहे. या पत्रात राजाराम कोडग यांची जर्सी गाय, दादासाहेब कोडग यांची जर्सी गाय, सावित्री कोडग यांची म्हैस, पांडुरंग शिंदे यांची गाय, अमोल बाबर यांची गाय, तुकाराम कोडग यांचा बैल, पोपट कोळी यांची गाय, लहू कोडग यांच्या दाेन गाई, जनार्दन कोडग यांची म्हैस, रमेश कोडग यांची जर्सी गाय, शामराव कोडग यांचा रेडा, कृष्णदेव कोडग यांचा रेडा, समाधान कोडग यांची म्हैस व रेडा, सीताराम कोडग यांची जर्सी गाय, शिवाजी पाटील यांची गाय, रामचंद्र कोडग यांची जर्सी गाय, विष्णू पाटील यांची म्हैस, बाबासाहेब कोडग यांचे दाेन रेडे, धनाजी शिंदे यांचा रेडा, विजय कोडग यांचा रेडा, मारुती पाटील यांचा रेडा, विष्णू गेजगे यांचे रेडकू, विनायक कोडग यांचा रेडा, रावसाहेब देशमुख यांची जर्सी गाय अशा एकूण २४ शेतकऱ्यांच्या २७ जनावरांचा मृत्यू झाल्याचे म्हटले आहे.
काेट
मृत्यू झालेल्या पशुपालक शेतकऱ्यांना नुकसानभरपाई जिल्हा परिषदेकडून मिळणार आहे. लवकरच पंचनामे करून अहवाल पाठवला जाईल. पिसाळलेले श्वान जर जनावरांना चावले, तर कोणत्याही शेतकऱ्यांनी घरगुती उपचार करू नयेत. तातडीने पशुसंवर्धन विभागाशी संपर्क करावा. रेबिजची लस ही शासकीय रुग्णालयात उपलब्ध नसते. त्यामुळे लस तातडीने इतर ठिकाणांहून शेतकऱ्यांनी विकत घ्यावी, त्या लसीची रक्कम अर्ज केल्यानंतर परत मिळते.
- डॉ. विष्णू जवणे
तालुका पशुसंवर्धन अधिकारी