कारखान्यांनी यंत्राने ऊस तोडणीला प्राधान्य द्यावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:32 AM2021-09-10T04:32:51+5:302021-09-10T04:32:51+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शिराळा : साखर कारखानदारीपुढील तोडणी मजुरांची टंचाई पाहता, कारखान्यांनी यंत्राने ऊस तोडणीला प्राधान्य द्यावे, असे प्रतिपादन ...
लोकमत न्यूज नेटवर्क
शिराळा : साखर कारखानदारीपुढील तोडणी मजुरांची टंचाई पाहता, कारखान्यांनी यंत्राने ऊस तोडणीला प्राधान्य द्यावे, असे प्रतिपादन युवक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विराज नाईक यांनी व्यक्त केले.
चिखली (ता. शिराळा) येथील विश्वासराव नाईक कारखान्यावर जिल्ह्यातील सर्व कारखान्यांतील मुख्य शेती अधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी विराज नाईक बोलत होते.
जिल्हाध्यक्ष नाईक म्हणाले, तोडणी मजुरांची चणचण प्रत्येक हंगामात जाणवू लागली आहे. त्यामुळे ऊस तोडणीसाठी यंत्राचा वापर करणेच योग्य आहे. विश्वास कारखान्याचे कार्यक्षेत्र डोंगराळ व क्षेत्र गुंठेवारीत आहे. त्यामुळे आम्हाला ऊस तोडणीसाठी यंत्राचा उपयोग फारसा होणार नाही. विश्वास कारखाना ऊस विकासच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत आहे. सर्व कारखान्यांनी शेतकऱ्यांचे हित जोपासण्यासाठी सरकारकडे प्रयत्नशील असले पाहिजे.
मुख्य शेती अधिकारी विठ्ठल चव्हाण यांनी स्वागत केले. बैठकीत हंगाम २०२१-२२ साठी उसाची नोंद व उपलब्धता, पूरबाधित ऊस क्षेत्राची माहिती, बैलगाडी, ट्रक, ट्रॅक्टर व तोडणी वाहतूक उचल देण्याबाबत धोरण ठरविण्यात आले. डिझेल दरवाढीनुसार वाहतूक दरपत्रक तयार करण्याबाबत विचारविनिमय व तोडणी मजूर टोळीभाडे वाढ करण्याबाबतही चर्चा झाली. बैठकीत कार्यकारी संचालक राम पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले.
यावेळी दिलीप पार्लेकर (क्रांती), प्रशांत पाटील (राजारामबापू पाटील), परशुराम चव्हाण (हुतात्मा), प्रशांत कणसे (सोनहिरा), सतीश मिरजकर (मोहनराव शिंदे), मनोहर मिसाळ (दालमीया), अनिरुध्द पाटील (दत्त इंडिया), उत्तमराव पाटील (उदगीर), सुनील पवार (तासगाव), संजय मोहिते (नागेवाडी) व मोहनराव पाटील (सह्याद्री, जि. सातारा) हे मुख्य शेती अधिकारी उपस्थित होते.