Sangli: उच्चांकी पावसाचं गाव 'पाथरपुंज' पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत, गावात मूलभूत सुविधांची वानवा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2024 05:43 PM2024-07-02T17:43:53+5:302024-07-02T17:44:30+5:30

देशातील सर्वांत जास्त पाऊस पडणाऱ्या चेरापुंजीला मागे टाकले आणि त्याची जागा पाथरपुंजने घेतली

High rainfall village Patharpunj awaiting rehabilitation, lack of basic facilities in the village | Sangli: उच्चांकी पावसाचं गाव 'पाथरपुंज' पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत, गावात मूलभूत सुविधांची वानवा

Sangli: उच्चांकी पावसाचं गाव 'पाथरपुंज' पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत, गावात मूलभूत सुविधांची वानवा

विकास शहा

शिराळा : सन २०१९ ला पाथरपुंज हे गाव अचानक चर्चेत आले. देशातील सर्वांत जास्त पाऊस पडणाऱ्या चेरापुंजीला मागे टाकले आणि त्याची जागा पाथरपुंजने घेतली. सर्वाधिक पावसाच्या या गावातील लोकांचे जीवनमान मात्र कष्टाने भरलेले आहे. गावात जायला पक्का रस्ता नाही, मोबाइलला रेंज नाही, ना दवाखाना, ना वीज असे अनेक प्रश्न असल्याने तेथील गावकरी कित्येक वर्षांपासून पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत आहेत.

पाथरपुंज (ता. पाटण, जि. सातारा) हे कोयना विभागाच्या दक्षिण टोकावर चांदोली अभयारण्यात येणारे गाव आहे. अवघी ५६ घरे व ३५० लोकसंख्या, कोणतीही सुविधा नाही, ना मोबाइल, ना फोन, ना बँक, ना बचतगट, ना कोणती सुविधा. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात बफर झोनमध्ये असणारे हे गाव अनेक वर्षांपासून पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत आहे. पाटण तालुक्यात हे गाव येत असले, तरी सातारा, सांगली, रत्नागिरी या तीन जिल्ह्यांच्या सीमारेषेवर ते वसले आहे. या गावातील घरे तिन्ही जिल्ह्यांत विभागली आहेत. कोयनेच्या दक्षिण टोकावर हे गाव वसले असले, तरी याठिकाणी उच्चांकी पडणाऱ्या पावसाचे पाणी चांदोली धरणात जात असल्याने हे धरण भरते.

वारणा खोऱ्यातील निवळी, धनगरवाडा व पाथरपुंज ही तीन रेनगेज स्टेशन येतात. त्यातील निवळी व पाथरपुंज येेथील घरे तिन्ही जिल्ह्यांत विभागली आहेत. त्यातील निवळी व पाथरपुंज याठिकाणी पडणारा पाऊस महत्त्वाचा आहे. मेघालयमधील चेरापुंजी इथं सरासरी तब्बल ८००० मिलिमीटर पाऊस पडतो. पण २०१९ मध्ये या भागात पाऊस कमी पडला. चेरापुंजीत ६ हजार ८२ इतका तर पाथरपुंज येथे ९ हजार ४२१ मिलिमीटर पाऊस पडला होता. त्यामुळे पाथरपुंज नाव पुढे आले. सर्वांत जास्त पर्जन्यमान असलेला भाग म्हणून कायमचं कोरलं. पाथरपुंज येथे हे पहिल्यांदाच घडलं आहे, याचं कारण आहे पश्चिम बंगाल, ओडिशा भागातला कमी दाबाचा पट्टा मध्य भारताकडे सरकल्यामुळे महाबळेश्वर आणि आसपासच्या भागात सर्वाधिक पाऊस पडला आहे, असा त्यावेळी निष्कर्ष काढला होता.

 यामुळे पडतो सर्वाधिक पाऊस

पाथरपुंजमध्ये असणारी सह्याद्रीच्या कड्याची सलग रांग व हे उंच ठिकाण आहे. घनदाट जंगल, येथील कडा (दरी) काटकोनात आहेत. त्यामुळे मान्सूनचे ढग कोणत्याही दिशेने आले तरी त्या ढगांना अडविण्याची योग्य जागा असल्याची माहिती जल विज्ञान व जल हवामान विभागाकडून देण्यात आली.

पावसाळ्यात सर्व रस्ते बंद

पाथरपुंज येथे जाण्यासाठी दळणवळणाचा रस्ता खडतर आहे. ठराविक चारचाकी गाडी कसरत करत जाऊ शकते. अन्यथा पंधरा-सोळा किलोमीटर चालत यायचे. पावसाळ्यात नाले, ओढे प्रवाहित झाले की सर्वच रस्ते बंद, गावातून बाहेरही पडू शकत नाही.

पाथरपुंजमध्ये ५ ऑगस्ट २०१९ ला ४३० मिलिमीटर हा सर्वांत जास्त पाऊस पडला.

एका वर्षात पडलेला पाच हजार मिलिमीटरपेक्षा जास्त एकूण पाऊस
२०१९-२०  - ९९५६
२०२०-२१ - ६४३३
२०२१-२२  - ७०२३
२०२२-२३ - ६९६८
२०२३-२४  - ५७२६

Web Title: High rainfall village Patharpunj awaiting rehabilitation, lack of basic facilities in the village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.