सुशासन निर्देशांकात पर्यावरणामध्ये राज्यात सांगली पहिल्या क्रमांकावर, आरोग्यमध्ये कोणत्या जिल्ह्याचे काम चांगले..वाचा
By संतोष भिसे | Updated: December 28, 2024 13:57 IST2024-12-28T13:56:53+5:302024-12-28T13:57:27+5:30
सातारा, कोल्हापूर पिछाडीवर

सुशासन निर्देशांकात पर्यावरणामध्ये राज्यात सांगली पहिल्या क्रमांकावर, आरोग्यमध्ये कोणत्या जिल्ह्याचे काम चांगले..वाचा
संतोष भिसे
सांगली : सुशासन निर्देशांकात पर्यावरणातसांगली जिल्हा राज्यात पहिल्या क्रमांकावर आला आहे. छत्रपती संभाजीनगर द्वितीय, तर सोलापूर जिल्हा तृतीय क्रमांकावर आहे. मुंबई शहर चौथ्या, तर मुंबई उपनगर पाचव्या क्रमाकांवर आहे. उर्वरित क्षेत्रांत मात्र घसरण झाली असून, तेथील सुशासन समाधानकारक नसल्याचे दिसत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी मुंबईत सह्याद्री अतिथिगृहात ‘जिल्हा सुशासन निर्देशांक २०२४’ या अहवालाचे प्रकाशन केले. राज्याची अर्थव्यवस्था एक कोटी डॉलर्स करण्याच्या दृष्टीने हा अहवाल महत्त्वाचा आहे. सर्वच जिल्ह्यांचा सुशासन निर्देशांक सुधारण्याची गरज आहे, असे फडणवीस म्हणाले. प्रत्येक शहरातील ‘इज ऑफ लिव्हिंग’ (राहण्यासाठी अनुकूल) निश्चितीसाठीही सुशासन निर्देशांक उपयुक्त ठरतो.
कृषी व संबंधित क्षेत्रे, वाणिज्य व उद्योग, मनुष्यबळ विकास, सार्वजनिक आरोग्य, पायाभूत सोयी-सुविधा, सामाजिक विकास, आर्थिक सुशासन, न्यायप्रणाली व सुरक्षा, पर्यावरण, लोककेंद्रित शासन या निकषांनुसार शहरांची पाहणी करण्यात आली. त्यामध्ये सांगली जिल्ह्याने पर्यावरण क्षेत्रात पहिला क्रमांक मिळविला.
१० क्षेत्रांत १६१ मापदंड
संबंधित शहरातील रहिवाशांना शासकीय सेवा कितपत सुलभतेने मिळतात, हे सुशासन निर्देशांकावरून स्पष्ट होते. केंद्र शासनाच्या सहकार्याने विविध मापदंडांद्वारे शहरांचे निर्देशांक ठरविण्यात आले. १० विविध क्षेत्रांत १६१ मापदंड निश्चित करण्यात आले. त्यानुसार त्या-त्या शहरांत पाहणी करून सुशासन निर्देशांक जाहीर करण्यात आला.
कोल्हापूर, सातारा पिछाडीवर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आघाडीवर
१० विविध क्षेत्रांतील १६१ मापदंडांमध्ये सातारा, कोल्हापूर जिल्हे कशातच बसले नसल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे. सिंधुदुर्ग जिल्हा मात्र सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात पहिल्या क्रमांकावर आहे. रत्नागिरी जिल्हा पाचव्या क्रमांकावर आला आहे. कृषी व संबंधित क्षेत्रांमध्ये कोल्हापूर जिल्ह्याची स्थिती चांगली असतानाही या विभागात तो पहिल्या पाचमध्ये नाही. कृषीमध्ये अमरावती अव्वल आहे.