धक्कादायक प्रकार! वाळव्यात काळी जादू; स्व. राजाराम बापूंच्या फोटोला टाचण्या टोचल्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 20:34 IST2026-01-22T20:22:12+5:302026-01-22T20:34:48+5:30
राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका सुरू आहेत. दरम्यान, सांगलीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

धक्कादायक प्रकार! वाळव्यात काळी जादू; स्व. राजाराम बापूंच्या फोटोला टाचण्या टोचल्या
राज्यात नुकत्याच महानगरपालिकांच्या निवडणुका पार पडल्या. आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. उमेदवारांची अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
सांगली जिल्हा परिषद, पंचायत समित्यांसाठी विक्रमी १९०० अर्ज दाखल; आजी-माजी आमदारांचे नातेवाईक रिंगणात
वाळवा तालुक्यातील येलूरमध्ये स्व. राजाराम बापू पाटील यांच्या फोटोला टाचण्या टोचल्याचे आणि फोटोवर लिंबू ठेवल्याचे आढळून आले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. स्व. राजाराम बापू पाटील हे माजी मंत्री जयंत पाटील यांचे वडील आहेत.
सांगलीमध्ये (येलूर, ता. वाळवा) लोकनेते स्व. राजाराम बापू पाटील यांचा फोटो असलेल्या पोस्टरला काळा रंग फासून, टाचण्या टोचून आणि त्यावर लिंबू, केळी असा उतारा करुन हा फोटो रस्त्याच्या कडेला फेकून दिल्याचा प्रकार अत्यंत निंदनीय आहे. पुरोगामी महाराष्ट्रात असा प्रकार होत असेल आणि एका…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) January 22, 2026
या प्रकरणी आमदार रोहित पवार यांनी ट्विट केले आहे, "सांगलीमध्ये (येलूर, ता. वाळवा) लोकनेते स्व. राजाराम बापू पाटील यांचा फोटो असलेल्या पोस्टरला काळा रंग फासून, टाचण्या टोचून आणि त्यावर लिंबू, केळी असा उतारा करुन हा फोटो रस्त्याच्या कडेला फेकून दिल्याचा प्रकार अत्यंत निंदनीय आहे, "असे पवार यांनी म्हटले आहे.
"पुरोगामी महाराष्ट्रात असा प्रकार होत असेल आणि एका दिवंगत लोकनेत्याच्या फोटोची अशा प्रकारे विटंबना केली जात असेल तर हे संतापजनक आणि चीड आणणारं आहे. हे करणाऱ्या समाजकंटकांचा शोध घेऊन पोलिसांनी त्यांच्याविरोधात कठोर कारवाई करावी, ही विनंती!, अशी मागणी रोहित पवार यांनी केली.
जिल्हा परिषद, पंचायत समित्यांसाठी विक्रमी १९०० अर्ज दाखल
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी एकूण जिल्ह्यातून विक्रमी १९०० इतके अर्ज दाखल झाले. त्यामध्ये जिल्हा परिषदेसाठी ६५७ व पंचायत समितीसाठी एक हजारांवर अर्जांचा समावेश आहे. दाखल अर्जांची गुरुवार दि. २२ रोजी छाननी होणार आहे. आजी-माजी आमदारांच्या नातेवाईकांनीही अर्ज दाखल केले.
पाच दिवसांच्या तुलनेत बुधवारी अखेरच्या दिवशी अर्ज भरण्यासाठी उमेदवारांची झुंबड उडाल्याचे चित्र जिल्ह्यात सर्वत्र दिसत होते. उमेदवारांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत अर्ज दाखल केले. दुपारी तीनपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत असल्याने उमेदवारांची वेळेत अर्ज दाखल करण्यासाठी धांदल उडाली होती. वेळ संपण्यापूर्वी काही मिनिटे अगोदर निवडणूक अधिकाऱ्यांकडून ध्वनिक्षेपकावरून अर्ज दाखल करण्यासाठी आलेल्या उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी निश्चित केलेल्या परिक्षेत्र परिसरात येण्याचे आवाहन करण्यात येत होते. तीन वाजता या परिक्षेत्रात असणाऱ्या उमेदवारांना आत घेऊन त्यानंतर प्रवेश बंद करण्यात आला.