कोयनेतून सांगलीत पोहोचले पाणी अन् एक टीएमसी संपले, ताकारी योजना रविवारपासून सुरू होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2023 02:09 PM2023-11-03T14:09:44+5:302023-11-03T14:19:42+5:30

पाऊस कमी झाल्यामुळे जिल्ह्यात पाणीटंचाईने उग्र रूप धारण केले

Water reaching Sangli from Koyna and one tmc has run out, Takari scheme will start from Sunday | कोयनेतून सांगलीत पोहोचले पाणी अन् एक टीएमसी संपले, ताकारी योजना रविवारपासून सुरू होणार

कोयनेतून सांगलीत पोहोचले पाणी अन् एक टीएमसी संपले, ताकारी योजना रविवारपासून सुरू होणार

सांगली : कोयना धरणातून सोडलेले एक टीएमसी पाणी बुधवारी सांगलीत पोहोचेपर्यंतच संपले. पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी आणखी दोन टीएमसी पाणी सोडण्याची विनंती केल्यामुळे कोयनेतून अखंडित एकूण तीन टीएमसीपर्यंत पाणी सोडण्यात येणार आहे. या तीन टीएमसीपैकी ९०० दशलक्ष घनफूट पाणी ताकारी योजनेस मिळणार आहे. दरम्यान, रविवारी किंवा सोमवारपासून ताकारी योजना चालू होईल, अशी माहिती ताकारी योजनेचे कार्यकारी अभियंता राजन डवरी यांले आणीले आणीनी दिली.

पाऊस कमी झाल्यामुळे जिल्ह्यात पाणीटंचाईने उग्र रूप धारण केले आहे. ऑक्टोबर महिन्यामध्येच कृष्णा नदी कोरडी पडली होती. म्हणून शेतकऱ्यांनी आंदोलन छेडल्यानंतर कोयना धरणातून २७ ऑक्टोबरपासून दोन हजार १०० क्युसेकने पाणी सोडले होते. सहा दिवसाने बुधवारी सायंकाळी ६ वाजता कृष्णा नदीमध्ये सांगलीत पाणी पोहोचेपर्यंत एक टीएमसी पाणी संपले.

त्यानंतर तातडीने पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता ज्योती देवकर यांनी कोयना धरण व्यवस्थापनाशी विनंती करून आणखी दोन टीएमसी पाणी सोडण्याची विनंती केली होती. त्यानंतर पुढील दोन टीएमसी पाणी कोयना धरणातून सोडले जात आहे. नदी कोरडी पडल्यामुळे अत्यंत कमी गतीने पाणी पुढे सरकत आहे. गुरुवारी सांगली बंधाऱ्यात पाणीसाठा सुरू झाला होता. दोन दिवसात बंधाऱ्यामध्ये पाण्याचा पुरेसा साठा होणार आहे.

कोयना धरणातून एकूण तीन टीएमसी पाणी सांगलीसाठी मिळणार आहे. या तीन टीएमसीमधून ९०० दशलक्ष घनफूट पाणी ताकारी योजनेसाठी सोडण्यात येणार आहे. सांगली बंधाऱ्यात पूर्ण क्षमतेने पाणी सोठविल्यानंतर ५ किंवा ६ नोव्हेंबरपासून ताकारी योजना सुरू करून शेतकऱ्यांना पाणी सोडण्यात येणार आहे, अशी माहिती कार्यकारी अभियंता डवरी यांनी दिली.

बारा टीएमसी जादा मिळेल

कोयनेतून वीज निर्मितीचे १२ टीएमसीचे जादा पाणी सांगलीला मिळावे, अशी मागणी शासनाकडे केली आहे. निश्चित शासनाकडून जादा १२ टीएमसी सांगलीला मिळणार आहे, अशी माहिती आमदार अरुण लाड यांनी दिली आहे.

कोयना धरणातून सोडलेले एक टीएमसी पाणी बुधवारी सांगलीत पोहोचले. पण, तोपर्यंत एक टीएमसी पाणी संपले. कृष्णा नदी कोरडी पडल्यामुळे पाणी कमी गतीने पुढे सरकत आहे. म्हणून कोयनेतून दोन टीएमसी जादा मागितले होते. त्यासही मंजुरी मिळाल्यामुळे एकूण तीन टीएमसी पाणी सांगलीला मिळणार आहे. ते पाणी कोयनेतून अखंडित चालू आहे. -ज्योती देवकर, कार्यकारी अभियंता.

Web Title: Water reaching Sangli from Koyna and one tmc has run out, Takari scheme will start from Sunday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.