'लाडक्या बहिणींचे पैसे बंद होऊ देणार नाही, आम्ही लढा देणार'; जयंत पाटलांनी थेटच सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 10:04 IST2025-02-12T09:56:17+5:302025-02-12T10:04:34+5:30
Jayant Patil : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लाडक्या बहिणींसाठी लढा उभारणार असल्याची घोषणा केली.

'लाडक्या बहिणींचे पैसे बंद होऊ देणार नाही, आम्ही लढा देणार'; जयंत पाटलांनी थेटच सांगितलं
Jayant Patil ( Marathi News ) : राज्यात काही महिन्यापूर्वीच 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' ही योजना सुरू केली आहे. योजनेअंतर्गत प्रत्येक महिन्याला महिलांना १५०० रुपये दिले जातात. आतापर्यंत महिलांच्या खात्यावर सात हप्ते जमा झाले आहे. दरम्यान,आता या योजनेत बदल करुन नवीन नियम आणल्याचा दावा करण्यात आला आहे. यामुळे अनेक महिलांना या योजनेतून वगळण्यात आल्याची बातमी समोर आली. यावरुन आता राजकीय वरर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी 'आम्ही लाडक्या बहीणींचे पैसे बंद होऊ देणार नाही, त्यांची पाठीशी उभे राहून लढा देणार' असल्याची घोषणा केली आहे.
"फडणवीस-अजितदादांची जवळीक, एकनाथ शिंदेंसोबत दुरावा; २ महिन्यात मोठे बदल होणार"
काल सांगली येथील एका कार्यक्रमात बोलताना जयंत पाटील यांनी ही घोषणा केली. यावेळी जयंत पाटील म्हणाले, एकदा पैसे दिले की दिले. लोकांनी यावर मतही दिली आहेत. आधीच नियम बघून द्यायला हवे होते. आता न बघता दिल्यावर थांबवता येणार नाहीत. आता महिलांचे पैसे थांबवता येणार नाहीत, आता आम्ही लाडक्या बहिणींच्या बाजूने आहोत. तुमचे पैसे बंद होणार नाहीत, यासाठी आमचा लढा कायम चालू राहिल. तुम्ही आता काहीच चिंता करु नका, अशी घोषणाच आमदार जयंत पाटील यांनी केली.
५ लाख लाभार्थ्यांना वगळले
काही दिवसापूर्वी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट दिली होती. त्यांनी नव्या निकषाबाबत माहिती दिली. या नव्या निकषांनुसार या योजनेतून पाच लाख महिला आता अपात्र ठरणार आहेत. जुलै २०२४ मध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली होती. या योजनेतील लाभार्थी महिलांना दरमहा १५०० रुपये थेट खात्यात दिले जात होते. आतापर्यंत योजनेचे सात हप्ते वितरीत करण्यात आले आहेत. फेब्रुवारी महिन्याचा हप्ता लवकरच देण्यात येणार आहे.
आपल्या पोस्टमध्ये तटकरेंनी लिहिले की, २८ जून २०२४ व दिनांक ३ जुलै २०२४ रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेतून वगळण्यात येत आहे.
अपात्र ठरविण्यात आलेल्या निकषांप्रमाणे संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असलेल्या २,३०,००० महिलांना वगळण्यात आले आहे. तसेच वय वर्षे ६५ पेक्षा जास्त असलेल्या १,१०,००० महिलांना योजनेतून अपात्र ठरविले गेले आहे. कुटुंबातील सदस्यांच्या नावे चारचाकी गाडी असलेल्या, नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या आणि स्वेच्छेने योजनेतून नाव मागे घेणाऱ्या १,६०,००० महिला आहेत. यानुसार एकूण पाच लाख महिला आता अपात्र ठरल्या आहेत.