वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालय बंद ठेवून प्रशासकांचे स्वागत

By admin | Published: July 10, 2017 01:05 PM2017-07-10T13:05:26+5:302017-07-10T13:05:26+5:30

वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाचे दैनंदिन कामकाज पाहण्यासाठी राज्य शासनाने नियुक्त केलेल्या प्रशासक मंडळाचे स्वागत सोमवारी महाविद्यालय बंदने करण्यात आले.

Welcome to the College of Walchand Engineering | वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालय बंद ठेवून प्रशासकांचे स्वागत

वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालय बंद ठेवून प्रशासकांचे स्वागत

Next
>ऑनलाइन लोकमत
सांगली, दि. 10 -  वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाचे दैनंदिन कामकाज पाहण्यासाठी राज्य शासनाने नियुक्त केलेल्या प्रशासक मंडळाचे स्वागत सोमवारी महाविद्यालय बंदने करण्यात आले. वालचंदमधील सर्वच कार्यालये कुलुप बंद असल्याने प्रशासकांना संगणक लॅबमध्ये बैठक घ्यावी लागली. महाविद्यालयाचे संचालक जी. व्ही. परिशवाड यांच्यासह २५० प्राध्यापक व कर्मचा-यांनी या बैठकीकडे पाठ फिरवली होती. दरम्यान, प्रशासक मंडळ महाविद्यालयात येणार असल्याने मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. 
 
वालचंद महाविद्यालयाच्या मालकी हक्कावरून महाराष्ट्र टेक्निकल एज्युकेशन सोसायटी व अजित गुलाबचंद यांच्या व्यवस्थापन समितीमध्ये वाद सुरू आहे. गतवर्षी महाविद्यालयाचा ताबा घेण्यावरून दोन्ही गटात जोरदार वाद झाला होता. अखेर शनिवारी वालचंद महाविद्यालयावर शासनाकडून प्रशासक मंडळाची नियुक्ती करण्यात आली. उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे सहसंचालक प्रमोद नाईक, शासननियुक्त सदस्य मकरंद देशपांडे व आयसीसीआय दिल्लीचे प्रतिनिधी असे तीन सदस्यांची नेमणूक केली आहे. सोमवारी प्रमोद नाईक यांनी महाविद्यालयात प्राध्यापक, कर्मचा-यांची बैठक बोलवली होती. प्रशासक मंडळाकडून दैनंदिन कामकाजाही सुरूवात करण्यात येणार होती. पण या प्रयत्नांवर पाणी फिरले. 
 
प्रशासक नाईक, मकरंद देशपांडे सकाळी साडेनऊ वाजता वालचंद महाविद्यालयात दाखल झाले. त्यांचे स्वागत महाविद्यालय बंदने करण्यात आले. वालचंद महाविद्यालयाला शनिवारीच सुट्टी देण्यात आली होती. विशेष म्हणजे कोणता सण, जयंती, समारंभ नसताना महाविद्यालय बंद ठेवण्यात आले होते. संचालक परिशवाड, उपसंचालक पी. जी. कुलकर्णी यांच्यासह महाविद्यालयातील सर्व विभागाला कुलुप लावण्यात आली होती. महाविद्यालयाच्या आवारात शुकशुकाट होता. विद्यार्थी, प्राध्यापकांपेक्षा पोलिसांची संख्या अधिक होती. 
 
पोलीस उपाधीक्षक डॉ. दीपाली काळे, पोलीस निरीक्षक राजेंद्र मोरे यांच्यासह पोलिसांचा मोठा फौजफाटा महाविद्यालयात होता. त्यामुळे संपूर्ण परिसराला पोलीस छावणीचे स्वरुप आले होते. महाविद्यालयातील कार्यालये उघडी नसल्याने प्रशासक मंडळाला बैठक कुठे घ्यायची असा प्रश्न होता. अखेर संगणक विभागाची लॅब उघडण्यात आली. तिथेच प्रशासक नाईक व देशपांडे यांनी प्राध्यापक व कर्मचा-यांची बैठक घेतली. या बैठकीला ३५० प्राध्यापक व कर्मचा-यापैकी ९० ते १०० जणच उपस्थित होते. संचालक परिशवाड, पी. जी. कुलकर्णी यांच्यासह अडीचशे जणांनी बैठकीला दांडी मारली होती. 
 
बैठकीत मकरंद देशपांडे यांनी स्वागत करीत वालचंद’ला नावारुपाला आणण्यासाठी सर्वांचेच योगदान राहिले आहे. व्यवस्थापनबाबतच वाद न्यायालयात सुरू असल्याने शासनाने दैनदिंन कामकाज पाहण्यासाठी समिती स्थापन केली आहे. यापुढे प्रशासक मंडळ जो निर्णय घेईल त्याला सर्वांनी सहकार्य करावे. महाविद्यालयातील वातावरण कुटुंबासारखे ठेवावे, असे आवाहन केले.  नाईक यांनीही प्रशासक नियुक्तीमागची शासनाची भूमिका स्पष्ट करीत प्राध्यापक, कर्मचा-यांच्या अडचणी समजावून घेतल्या. यापुढे प्रशासक मंडळाच्यावतीने दैनंदिन कामकाज होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. 
 
गैरहजरांना नोटीसा
प्रशासक मंडळाच्यावतीने बैठकीचे निमंत्रण संचालक, उपसंचालकांसह सर्व प्राध्यापक, कर्मचा-यांना देण्यात आले होते. तरीही संचालक परिशवाड यांच्यासह 250 जण गैरहजर होते. त्या सर्वांना नोटीसा काढून त्यांचा खुलासा मागविला जाईल. त्यानंतर उच्च व शिक्षण मंत्री विनोद तावडे, संचालक चंद्रशेखर ओक यांच्या निदर्शनास आणून त्यांच्या आदेशाने गैरहजर राहण्यावर पुढील कारवाई होईल, असे सहसंचालक नाईक यांनी स्पष्ट केले. 
 
मकरंद देशपांडे यांच्यावर जबाबदारी
प्रशासक मंडळात सहसंचालक प्रमोद नाईक, मकरंद देशपांडे व दिल्लीच्या एआयसीटीचे प्रतिनिधी आहेत. या मंडळाला महाविद्यालयाचे दैनदिंन कामकाज पहावे लागणार आहे. त्यात मकरंद देशपांडे हे स्थानिक असल्याने तेच दैनदिंन कामकाजात लक्ष घालतील. त्यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. भविष्यात गरज  भासल्यास कामकाजासंदर्भात विविध समित्याही स्थापन केल्या जातील, असेही नाईक यांनी सांगितले. 
 
विद्यार्थ्यांची गैरसोय
वालचंद महाविद्यालयाला अचानक सुट्टी दिल्याने विद्यार्थी, पालकांची गैरसोय झाली. सध्या डिप्लोमा, डिग्रीची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. अर्ज भरण्यासाठी विद्यार्थी, पालक महाविद्यालयात आले, पण सुट्टी असल्याने त्यांच्यात नाराजी होती. काही विभागाच्या परिक्षाही सोमवारी होत्या. पण त्याबाबत संचालकांनी कोणतेच आदेश न दिल्याने परिक्षार्थींची कोंडी झाली होती. 
 
 
शासनाच्या निर्णयाची महाविद्यालयाला कल्पना दिली होती. कोणतेही कारण नसताना महाविद्यालयाला सुट्टी देण्यात आली. तसेच अनेकजण गैरहजरही राहिले. आज झालेल्या बैठकीची व सद्यस्थितीचा अहवाल शिक्षण संचालकांना पाठविणार आहोत. चौकशीअंती वरिष्ठांच्या निर्देश देतील, त्यानुसार पुढील कारवाई होईल. सध्या प्रशासक मंडळाने महाविद्यालयाच्या कामकाजाला सुरूवात केली आहे. - डॉ. प्रमोद नाईक, सहसंचालक, उच्च व तंत्र शिक्षण विभाग

Web Title: Welcome to the College of Walchand Engineering

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.