सातारा बाजार समितीत ६०० क्विंटल बटाट्याची आवक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:28 AM2021-06-03T04:28:08+5:302021-06-03T04:28:08+5:30
सातारा : कोरोना लॉकडाऊनमुळे बंद असणाऱ्या बाजार समित्या आठ दिवसानंतर सुरू झाल्या. बुधवारी पहिल्याच दिवशी सातारा बाजार समितीत १,२४३ ...
सातारा : कोरोना लॉकडाऊनमुळे बंद असणाऱ्या बाजार समित्या आठ दिवसानंतर सुरू झाल्या. बुधवारी पहिल्याच दिवशी सातारा बाजार समितीत १,२४३ क्विंटल फळभाज्यांची आवक झाली. यामध्ये बटाट्याची सर्वाधिक ६०० क्विंटलची आवक राहिली. दरम्यान, बाजार समित्या सुरू झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
सातारा बाजार समितीत जिल्ह्यातील विविध ठिकाणाहून शेतीमाल येतो. तसेच पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातूनही काही प्रमाणात आवक होते. बाजार समितीत कांदा आणि बटाटा अधिक प्रमाणात येतो. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडक लॉकडाऊन दहा दिवसांपूर्वी लागू करण्यात आला होता. यामुळे बाजार समित्याही बंद होत्या. त्यामुळे शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने आर्थिक फटका बसला. मात्र, १ जूनपासून जिल्हाधिकाऱ्यांनी बाजार समित्या सुरू करण्यासाठी परवानगी दिल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
सातारा बाजार समितीत बुधवारी २३५ वाहनांतून १,२४३ क्विंटल फळभाज्यांची आवक झाली. बटाटा ६००, कांदा २२५ आणि लसूण व आल्याची प्रत्येकी २४ क्विंटलची आवक झाली. तसेच फळांचीही काही प्रमाणात आवक राहिली. बटाट्याला क्विंटलला १,४००पासून १,६०० रुपयांपर्यंत दर मिळाला. कांद्याला ५०० रुपयांपासून २ हजारांपर्यंत भाव मिळाला. कांद्याच्या दरात क्विंटलमागे ५०० रुपयांनी वाढ झाली तर गवारला १० किलोला ३०० ते ४०० रुपये दर मिळाला. गवारचा दर अजूनही तेजीत आहे. शेवगा शेंगला ४०० ते ५०० रुपयांपर्यंत दर मिळाला तर वांग्याला १० किलोला ३०० ते ३५० रुपये दर मिळाला. टोमॅटोला १०० ते १५० रुपये, कोबीला ६० ते ८० रुपये दर मिळाला. टोमॅटो व कोबीला दर अजूनही कमीच मिळत आहे तर फ्लॉवरला १० किलोला १५० ते २५० रुपये अन् दोडक्याला ३०० ते ४०० रुपये दर आला.
हिरव्या मिरचीला क्विंटलला २,५०० ते ३ हजारांपर्यंत भाव मिळाला. आल्याला १,५०० रुपयांपर्यंत दर मिळाला तर आल्याचा दर अजूनही कमीच आहे. लसणाला क्विंटलला ७ हजारांपर्यंत भाव मिळाला. विशेष म्हणजे वाटाण्याला भाव कमी होता. मात्र, दीड महिन्यापासून दरात सुधारणा झाली. बाजार समितीत बुधवारी वाटाण्याला क्विंटलला ८ हजारांपर्यंत दर मिळाला.
चौकट :
मेथी, कोंथिबीरचा दर वाढला...
आठ दिवसानंतर बाजार समिती सुरू झाली. समितीत मेथीच्या ७०० पेंड्यांची आवक झाली तर दर शेकडा १,३०० ते १,५०० रुपयांदरम्यान मिळाला. तसेच कोथिंबीरच्या १,५०० पेंड्या आल्या होत्या. पेंडीला शेकडा ६०० ते १ हजारांपर्यंत भाव मिळाला. मेथी आणि कोथिंबीरच्या दरात वाढ झाल्याचे दिसून आले.
......................................................