अंगणवाड्यांना १० दिवसांपासून टाळाच; मागण्यांवर चर्चाच नाही...

By नितीन काळेल | Published: December 13, 2023 05:11 PM2023-12-13T17:11:40+5:302023-12-13T17:12:17+5:30

५० हजार बालकं घरीच, ७ हजार सेविका, मदतनीस संपातच

Avoid Anganwadis for 10 days; There is no discussion on the demands... | अंगणवाड्यांना १० दिवसांपासून टाळाच; मागण्यांवर चर्चाच नाही...

अंगणवाड्यांना १० दिवसांपासून टाळाच; मागण्यांवर चर्चाच नाही...

नितीन काळेल ,सातारा : अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांनी विविध मागण्यांसाठी सुरू केलेला संप १० व्या दिवशीही सुरूच होता. त्यामुळे जिल्ह्यातील ४ हजारांहून अधिक अंगणवाड्यांना टाळा कायम आहे. परिणामी सुमारे ५० हजारांहून अधिक बालकं शिक्षणाशिवाय घरी आहेत. तर मागण्यांवर चर्चाच झाली नसल्याने संप अजूनही सुरूच आहे.

अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांच्या राज्य तसेच केंद्र शासनाकडे अनेक मागण्या प्रलंबित आहेत. याबाबत वारंवार आंदोलने करण्यात आली. पण, चर्चा आणि आश्वासनाशिवाय काहीच मिळाले नाही. त्यामुळे दि. ४ डिसेंबरपासून राज्यव्यापी संप सुरू करण्यात आला आहे. यामध्ये जवळपास सर्वच अंगणवाडी कर्मचारी संघटना सहभागी झाल्या आहेत. या संपाबाबत पाठीमागील आठवड्यातच संबंधितांना निवेदन देण्यात आले होते. तर संप सुरू झाल्यापासून जिल्ह्यातील विविध संघटना आंदोलनातून सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आहेत. यामध्ये शेकडोच्या संख्येने सेविका आणि मदतनीस सहभागी होत आहेत.

तर मागील १० दिवसांपासून जिल्हा परिषदेसमोरही सेविकांचे आंदोलन सुरूच आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील ४ हजारांवर अंगणवाड्या बंद असल्याने मुलांचे शिक्षणही थांबले आहे. तसेच पोषण आहारही बंद करण्यात आलेला आहे. यामुळे बालके वंचित आहारापासून वंचित आहेत.

सेविका, मदतनीसांच्या या आहेत मागण्या...

- अंगणवाडी कर्मचाऱ्यांची पदे वैधानिक असून त्यांना मिळणारा मोबदला वेतनच आहे. त्यामुळे शासकीय कर्मचारी घोषित करावे.

- वेतनश्रेणी, ग्रॅच्युईटी, भविष्य निर्वाह निधी आदी सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ द्यावा.

- मानधन वाढलेतरी महागाई दुपटीने वाढते. यासाठी दर सहा महिन्यांनी मानधनात महागाई निर्देशांकानुसार वाढ करावी.

- कर्मचाऱ्यांचा पेन्शनचा प्रस्ताव तयार करुन हिवाळी अधिवेशनातच मंजूर करावा.

- महानगर पालिका हद्दीत जागेचे निकष शिथिल करुन अंगणवाड्यांसाठी ५ हजार ते ८ हजार भाडे मंजूर करावे.

- आहाराचा ८ रुपये दर अत्यल्प असल्यामुळे कुपोषण निर्मूलन होण्याएेवजी वाढत चालले आहे. सर्वसाधारण बालकासाठी १६ आणि अतिकुपोषित बालकासाठी २४ रुपये दर करावा.


जिल्ह्यात ४५६० अंगणवाड्या...

सर्व्हेप्रमाणे जिल्ह्यात ३ ते ६ वयोगटातील बालकांची संख्या ७३ हजार २२९ आहे. त्यामधील अंगणवाडीत पटनोंदणी झालेले ६१ हजार ८८३ बालके आहेत. सध्या जिल्ह्यात ४ हजार ५६० अंगणवाड्या कार्यरत आहेत. त्यातील ४ हजारांहून अधिक अंगणवाड्यांना संपामुळे टाळा लागला आहे. तर गेल्या आठवड्यात फक्त ३२९ अंगणवाड्याच सुरू होत्या. संपामुळे अंगणवाड्या बंद असल्याने ५० हजारांहून अधिक मुले घरी आहेत.

Web Title: Avoid Anganwadis for 10 days; There is no discussion on the demands...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.