‘लाचलुचपत’ बनला ‘न्यूजमेकर’

By admin | Published: December 19, 2014 09:20 PM2014-12-19T21:20:31+5:302014-12-19T23:29:58+5:30

लाचखोरांवर कारवाई झाल्यामुळे शासकीय कार्यालयात लाचखोरीला थोड्याफार प्रमाणात का होईना अटकाव बसला

Becomes 'Laalchachpat', 'Newsmaker' | ‘लाचलुचपत’ बनला ‘न्यूजमेकर’

‘लाचलुचपत’ बनला ‘न्यूजमेकर’

Next

मोहन मस्कर-पाटील - सातारा येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यावर्षी पुणे विभागात चांगलाच चमकला. २८ लाचखोरांवर कारवाई झाल्यामुळे शासकीय कार्यालयात लाचखोरीला थोड्याफार प्रमाणात का होईना अटकाव बसला. अर्थातच याचे शंभर टक्के समर्थन करता येणार नसले तरीदेखील ‘एसीबी’ने आपला दबदबा ठेवला. विशेष म्हणजे, पाच पोलिसांनाही लाच घेताना रंगेहाथ पकडले. फक्त कारवाया करून न थांबता, कधी नव्हे ते ‘एसीबी’ यावर्षी अतिशय गुप्तपणे २३ अधिकाऱ्यांची चौकशी सुरू केली आहे. यामध्ये वर्ग एक ते चार वर्ग अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
‘एसीबी’ने केलेल्या कारवाया आणि तक्रारदारांना विश्वासात घेऊन केलेली कामगिरी उल्लेखनीय मानावी लागते. पोलीस उपअधीक्षक श्रीहरी पाटील, पोलीस निरीक्षक वैशाली पाटील, बी. एस. कुरळे आणि त्यांच्या सहकारी कर्मचाऱ्यांनी महसूल विभागातील लाचखोरांना अटकाव करण्याचा प्रयत्न केला. २०१४ मध्ये ‘एसीबी’ने एकूण २८ कारवाया केल्या. गेल्या पाच वर्षांतील आकडेवारी लक्षात घेता, या वर्षीच्या कारवाया सर्वाधिक आहेत. परिणामी सातारा येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ‘न्यूजमेकर’ ठरला आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, स्थानिक गुन्हे शाखा ‘न्यूजमेकर’ ठरत असताना दुसरीकडे जिल्ह्यात या वर्षात खंडणीखोर आणि त्यांची दहशत वाढू लागल्यामुळे पोलीस दलही चिंताग्रस्त बनले आहे. पोलीस दलाकडे दाखल झालेल्या तक्रारी लक्षात घेता, त्यास बळकटी मिळते. मात्र, यापैकी खऱ्या घटना किती आणि खोट्या घटना किती, याचा तपासही करणे क्रमप्राप्त बनले आहे. महिलांच्या अंगावरील दागिने हिसकावणे, वाहनचोरी आदी घटना जिल्ह्यात वाढल्या आहेत. विशेष म्हणजे, ग्रामीण भागातही याचे लोण पसरत चालले आहे.
दरोडे, चोरी, खून, लूटमार आता सातारकरांसाठी नवीन राहिलेले नाही. सोनसाखळी चोरी तर नित्याचाच विषय बनला आहे. झोपडपट्टी वर्चस्वावरून वाढलेली गुन्हेगारी आणि फुटकळदादांची चंगळवादी वृत्ती अनेकदा पोलिसांवर हल्ले करू लागली आहे. खंडणीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात दाखल होत असलेले गुन्हे लक्षात घेता पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्न निर्माण झाले आहे. झोपडपट्टी आणि त्यातील ‘फुटकळदादां’चा अंतर्गत संघर्षही पराकोटीला पोहोचला आहे. ‘फाळकूटदादां’नी तर कहरच केला आहे. सातारा बसस्थानकात प्रवाशांनी त्यांना दिलेला चोपही दुर्लक्षित करून चालणार नाही. पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणानंतर जिल्ह्यात अपघाताचे प्रमाण वाढले. परिणामी पोलिसांचेही काम वाढले आहे.

कऱ्हाडचे पोलीस उपअधीक्षक मितेश घट्टे-पाटील यांनी २९ लाखांच्या बनावट नोटा जप्त केल्या. या घटनेस सहा महिने होत नाहीत तोवर, सातारच्या स्थानिक गुन्हे शाखेने बनावट नोटा खपविण्यासाठी आलेल्या सहाजणांना अटक करून त्यांच्याकडून जवळपास सहा लाखांच्या नोटा जप्त केल्या.



स्थानिक गुन्हे शाखा चमकली
सातारची स्थानिक गुन्हे शाखाही यावर्षी चमकली. पोलीस निरीक्षक सीताराम मोरे यांच्या कारकिर्दीत नेहमीच वादाच्या भोवऱ्यात सापडलेली स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बाहेर काढत काही प्रमुख गुन्हे उघडकीस आणले. मयूर गोरे खून प्रकरण असो, अथवा कऱ्हाड येथे पकडलेला ‘सिरीयल किलर’सारखे प्रकार उघडकीस आणले. बनावट नोटा प्रकरणातही सक्षमपणे भूमिका बजावली. वाई येथील दरोडा, वीर धरणावरील दरोडा, कोरेगाव व्यापारी लूट, वाहनचोर टोळी अशा किती तरी घटना ‘एलसीबी’ने उघडकीस आणल्या.


‘लाचलुचपत’, ‘स्थानिक गुन्हे शाखा’ एका बाजूला सक्षमपणे काम करत असताना दुसरीकडे मात्र उदय जाधव नामक हवालदार तर दरोड्याच्या प्रकरणातच अडकला. एका सहायक पोलीस निरीक्षकाच्या ‘गोरख’धंद्यालाही ‘एसीबी’ने चाप लावला.

Web Title: Becomes 'Laalchachpat', 'Newsmaker'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.