वृद्ध माता-पित्यांसाठी पिलं शोधतायत केअरटेकर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:28 AM2021-06-03T04:28:20+5:302021-06-03T04:28:20+5:30
ओगलेवाडी : शिक्षण घेऊन मुले शहरात आणि परदेशी स्थायिक झाली आहेत. गावी असणारे आपले आई-वडील कसे असतील, याची काळजी ...
ओगलेवाडी : शिक्षण घेऊन मुले शहरात आणि परदेशी स्थायिक झाली आहेत. गावी असणारे आपले आई-वडील कसे असतील, याची काळजी मात्र त्यांना सतावत आहे. सध्या कोरोना काळ असल्याने वृद्ध आई-वडिलांची काळजी घेणारे कोणी नसल्याने विद्यानगरीत केअरटेकरची मागणी वाढत चालली आहे. निर्व्यसनी केअरटेकरचा शोध घेतला जात
आहे.
विद्यानगरी आणि परिसरात अनेक सुशिक्षित कुटुंबे स्थायिक झाली आहेत. त्यांनीही आपल्या पाल्यांना चांगले शिक्षण दिले आहे. ही मुले आता नोकरी व कामधंद्याच्या निमित्ताने मुंबई-पुणे यासह देश-विदेशात स्थायिक झाली आहेत. तसेच आता एक मुलगा, एक मुलगी अशी संस्कृती असल्याने मुलीचे लग्न होऊन सासरी गेली आणि मुलगा नोकरी निमित्ताने बाहेर राहत असल्यामुळे घरी आई-वडिलांची काळजी घेणारे कोणीच नाही. आतापर्यंत शेजारी-पाजारी काळजी घेत होते. आता कोरोनामुळे कोणी कोणाच्या घरी जात नाही. त्यामुळे आता मुलांना आई-वडिलांची खूप काळजी सतावत आहे. यामुळेच आता दिवसा नाही. मात्र रात्री आई-वडिलांची काळजी घेणारा पगारी माणूस नेमण्याची गरज निर्माण झाली आहे.
बाहेर राहणारे अनेकजण आता निर्व्यसनी आणि चांगली वागणूक असणारा ओळखीचा आणि रात्री बाहेर झोपू शकणारा राखणदार शोधत आहेत.
तीन हजारपासून सहा हजारांपर्यंत पगार देऊन राखणदार शोधण्यासाठी सांगत आहेत. पूर्ण ओळखीचा केअरटेकरच ठेवून घेतला जात आहे. त्याबरोबर सकाळी आणि संध्याकाळी आई-वडिलांची तब्बेत कशी आहे, याची फोनवरून माहिती घेतली जात आहे. सकाळी आणि सायंकाळी औषधे देण्याचे कामही हे लोक करीत आहेत. ज्या आई-वडिलांनी जन्म देऊन शिक्षण देऊन नोकरीयोग्य बनवले, त्यांची नोकरीमुळे सेवा करता येत नाही, ही खंत मनाला बोचत आहे. त्यातून बाहेर पडण्यासाठी हा मार्ग नाईलाजाने वापरावा लागत आहे. आई-वडिलांचाही एकटेपणा या माणसाच्या सोबतीने नाहीसा होतो आहे. वृद्धापकाळात हक्काचा आधार आवश्यक आहे. मात्र, हा आधारही मनाला उभारी देत आहे.