पारंपरिक युद्धात काँग्रेस, भाजपचा संघर्ष !

By admin | Published: February 17, 2017 11:03 PM2017-02-17T23:03:32+5:302017-02-17T23:03:32+5:30

तारळे जिल्हा परिषद गट : चौरंगी लढतीमुळे राजकीय उलथापालथ; अपक्षांचीही उडी, अनेकांची प्रतिष्ठा पणाला

Congress, BJP struggle in traditional war! | पारंपरिक युद्धात काँग्रेस, भाजपचा संघर्ष !

पारंपरिक युद्धात काँग्रेस, भाजपचा संघर्ष !

Next

एकनाथ माळी -- तारळे  देसाई, पाटणकर गटाभोवती फिरणाऱ्या जिल्हा परिषद गट व गणाच्या निवडणुकीत यंदा भाजप, काँग्रेससह दोन अपक्षांनी शड्डू ठोकल्याने यंदाची निवडणूक चौरंगी होत आहे. यंदाच्या निवडणुकीत राजकीय उलथापालथ होत असून, अनेकांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.तारळे गट व गणासाठी सर्वसाधारण महिला, मुरूड गणासाठी सर्वसाधारण पुरुष आरक्षण असल्याने या संधीचा लाभ घेण्यासाठी अनेक इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले होते. उमेदवारीची दोरी नेतेमंडळींच्या हाती असल्याने नेतेमंडळींनी उमेदवारी देताना विचारपूर्वक निर्णय घेतले आहे. त्यातून बंडाळी टाळण्याचा त्यांनी प्रयत्न केला असून, त्यामध्ये त्यांना यशही आल्याचे दिसते. काही दिवसांपूर्वी इच्छुक असणाऱ्या नेत्यांनी डावलल्यानंतरही उमेदवारी मिळालेल्या प्रचारात रंगले असल्याचे सध्या दिसून येत आहे. त्यामुळे प्रचारात चांगलीच रंगत आली आहे. तारळे जिल्हा परिषद गटासाठी शिवसेनेकडून सुजाता पाटील, राष्ट्रवादीकडून संगीता खबाले-पाटील, भाजपकडून सुवर्णा निकम, काँग्रेसकडून कांचन खामकर तर तारळे गणासाठी शिवसेनेकडून संगीता जाधव, राष्ट्रवादीकडून रेश्मा जाधव, भाजपकडून सावित्रा लाहोटी, काँग्रेसकडून वनिता पाटील रिंगणात आहेत. मुरूड गणात शिवसेनेकडून विजय पवार, राष्ट्रवादीकडून विलास देशमुख, भाजपकडून नितीन जाधव, काँग्रेसकडून वसंतराव पाटील, अपक्ष म्हणून सोमनाथ काळकुटे तर शिवसेनेतून बंडखोरी केलेले शहाजी सोनावले नशीब आजमावत आहेत. आता प्रचार शिगेला पोहोचला असून, दिवसाबरोबरच रात्री उशिरापर्यंत उमेदवार प्रचारात गुंतल्याचे दिसून येत आहे.या निवडणुकीच्या तोंडावर देसाई गटाच्या दोन दिग्गज नेत्यांनी तारळे विभागात कमळ फुलवून देसाई-पाटणकर गटाच्या संघर्षात उडी घेतली आहे. त्यामुळे राजकारण ढवळून निघाले आहे. त्यातच काँग्रेसने तिन्ही जागांवर उमेदवार देऊन पक्षाचे अस्तित्व दाखवण्याचा चंग बांधला आहे. मुरूड गणात दोन अपक्षांची भर पडल्याने निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे.
यामध्ये अनेकांची राजकीय गणिते बिघडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. उमेदवारांनी प्रचारासाठी पायाला भिंगरी बांधली आहे. खेड्यापाड्यात, वाडी-वस्तीवर रात्री उशिरापर्यंत बैठका झडत आहेत. आपला हक्काचा मतदार शाबूत ठेवत दुसऱ्या पक्षाच्या मतदाराला गळ लागतो का, याची चाचपणी सुरू आहे. सध्या तारळे विभागात यात्रांचा हंगाम चालू असल्याने चाकरमानी गावाकडे परतले आहेत.
तारळे विभाग हा देसाई गटाचा बालेकिल्ला समजला जातो. गतवेळच्या निवडणुकीत पाटणकर गटाने गनिमी कावा करत बालेकिल्ल्याला खिंडार पाडले होते. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत देसाई गटाने त्याची पुरती परतफेड केली. त्यातच आता देसाई गटातील दोन दिग्गजांनी गटाशी फारकत घेत भाजपमध्ये प्रवेश केला. याचा फायदा घेण्यासाठी पाटणकर गटाने कंबर कसली आहे. दुसरीकडे भाजपच्या रामभाऊ लाहोटी यांनी भाजपचे उमेदवार निवडून आणण्यासाठी आटोकाट प्रयत्न सुरू केले आहेत.
फुटीचा फायदा इतरांना होऊ नये, यासाठी आमदार देसाई यांनी स्थानिक पातळीवरील नेत्यांना देसाई गटाची मोट बांधून ठेवण्याचा कानमंत्र दिला आहे. तर दुसरीकडे माजी आमदार पाटणकर यांनी या संधीचा फायदा कशाप्रकारे उठवता येईल, अशा सूचना स्थानिक नेत्यांना दिला आहे. त्यातच काँग्रेसची रणनीती कशी चालते, ती कोणाच्या पथ्यावर पडणार हे काही दिवसांत समोर येईलच. त्याची वाट न बघता गुलाल आपलाच म्हणत सर्वांनीच प्रचारात वाहून घेतले आहे.
तारळे गट, गण व मुरूड गणाची निवडणूक अनेक कारणांनी लक्षवेधी ठरत आहे. या निवडणुकीत अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. मोठ्या प्रमाणात राजकीय उलथापालथ होणार असल्याने संपूर्ण तालुक्याचे लक्ष तारळे विभागाकडे लागले आहे. प्रत्येकजण आपापल्या पक्षाचे राजकीय आडाखे बांधत मतांची बेरीज-वजाबाकी करण्यात गुंतले आहेत. कायम दुरंगी होणारी लढत यंदा प्रथमच चौरंगी होणार असल्याने ‘कौन कितने पानी में’ हे लवकर दिसून येणार आहे.
त्यातच पाटण विभागातील केरळ, मणदुरे, धडामवाडी ही गावे तारळे गटाला जोडल्याने त्या गावच्या निर्णायक मतावर तारळे विभागातील राजकीय भूकंप अवलंबून असल्याची चर्चा आहे. त्यामुळे या तिन्ही गावांत वरिष्ठ पातळीवरील नेत्यांकडून बारकाईने लढा दिला जात आहे. पहिल्यांदाच या गावांची मते तारळे गटात दिसणार असल्याने राजकीय विश्लेषकांच्या नजराही याच गटावर आहेत.


अनेक निवडणुकीत काठावरच विजय
यापूर्वीच्या अनेक निवडणुकीत देसाई, पाटणकर गटाला बहुतांश वेळा काठावरच विजय मिळवता आला आहे. त्यातच विधानसभा निवडणुकीत देसाई गटाने तब्बल साडेपाच हजार मते जास्त मिळविली आहेत. तारळे विभागात भाजप किती मते घेणार व पाटणकर गट चक्रव्यूह रचून वाढत्या मतांची परतफेड कशी करणार, हे थोड्याच दिवसांत समोर येईल.


सोशल मीडियाचा वापर जोमात
अनेक गावांतून रॅली काढून सर्व पक्षांकडून शक्तिप्रदर्शन करण्यात आले आहे. मतदारांना चार्ज करण्यासाठी बॅनर, लाऊड स्पिकरच्या जोडीला फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप तयार करण्यात आले आहेत. या ग्रुपच्या माध्यमातून प्रचार जोरात सुरू आहे. तसेच युवकांनी गावागावात व्हॉट्सअ‍ॅपचे गु्रप तयार केले असून या माध्यमातून उमेदवरांचा प्रचार अगदी शिगेला पोहोचला आहे.


सभापती पदासाठी वाढली चुरसपाटण पंचायत समिती सभापती पदासाठी सर्वसाधारण महिला आरक्षण आहे. तारळे पंचायत समिती गणामध्ये महिला सर्वसाधारण उमेदवार असल्याने या निवडणुकीला विशेष महत्त्व आले आहे. चारही पक्षांच्या उमेदवारांनी कसोशिने प्रयत्न सुरू केले आहेत. सभापतीच्या खुर्चीवर डोळा ठेवत वरिष्ठ नेते मंडळींनीही या गणाकडे बारकाईने लक्ष ठेवले आहे.

Web Title: Congress, BJP struggle in traditional war!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.