हद्दपार झाला छकडा.. अन् कोपऱ्यात हातगाडा!
By admin | Published: November 29, 2015 11:31 PM2015-11-29T23:31:49+5:302015-11-30T01:18:28+5:30
आधुनिकीकरणामुळे उपासमार : सातारा शहरात उरले फक्त चार गाडे
जावेद खान-- सातारा--स्वातंत्र्यपूर्व काळ आठवला तर त्यावेळी वाहतुकीच्या साधनांची फारशी सोय नव्हती. प्रवाशी वाहतुकीसाठी घोडागाडी अन् मालवाहतुकीसाठी हातगाड्या असायच्या. आता जमाना बदलला आहे. पूर्वी शान समजल्या जाणाऱ्या घोडागाड्या आता केवळ पर्यटनस्थळी रपेट मारण्यासाठी वापरल्या जात आहेत. आधुनिकीकरणामुळे छकडे हद्दपार झाले आहेत तर पूर्वी मालवाहतूक करणाऱ्या हातगाड्याही कोपऱ्यात पडलेल्या पाहायला मिळत आहेत. ब्रिटिशकाळात साहित्यांची ने-आण करण्यासाठी हातगाडा, छकडा याशिवाय पर्याय नव्हता. स्वातंत्र्योत्तर काळातही हातगाडे, घोडागाडी बरीच वर्षे शहराच्या ठिकाणी पाहायला मिळत होती. मात्र वाहननिर्मिती क्षेत्रात वाढ झाल्याने अनेक कंपन्यांनी मालवाहतुकीबरोबरच प्रवाशी वाहतुकीच्या सोयीसाठी अनेक प्रकारची वाहने बाजारात आणली आहेत, ज्यामुळे काम सोपे झाले आहे. हातगाड्यांच्या जागी आता छोटी आधुनिक वाहने आली आहेत. त्यामुळे जुनी साधनं काळाच्या पडद्याआड चाललेली आहे.साताऱ्यात होते शेकडो हातगाडे
ब्रिटिशकाळापासून सातारच्या मुख्य बाजारपेठेत जवळपास शंभरहून अधिक मालवाहतूक करणाऱ्या हातगाड्यांची संख्या होती. कामगार हातगाड्या, छकड्यांच्या साह्याने रात्रंदिवस काम करायचे. खासकरून बसस्थानक व रेल्वे स्थानकात हातगाडे दिसायचे. रोजगाराची ही मोठी केंद्रे असल्यामुळे मालवाहतूक करण्याची वर्दी हमखास मिळायची.
कष्ट जास्त, मोबदला कमी
सातारा शहराची भौगोलिक रचना चढ-उताराची आहे. अशा भागात हातगाडी चालविणे मोठे कष्टाचे असते. मात्र कष्टाच्या बदल्यात मिळणारा मोबदला फारच कमी असल्यामुळे कामगारांची आर्थिक स्थिती सुधारणे अवघड असल्याचे चाळीस वर्षांपासून हातगाडा ओढण्याचे काम करणारे आनंद दोरके यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
बिले, परवाने देणे बंद
पूर्वी वाहतूक शाखेकडून हातगाडाधारकांना बिले दिली जायची. त्याच्या नूतनीकरणाचा कालावधी २-३ वर्र्षाचा कालावधी होता. २० ते ३० रूपयांत हे नूतनीकरण होत होते. १९९५-९६ मध्ये हातगाड्यांचे शेवटचे नूतनीकरण झाले. तेव्हापासून बिले, परवाने देणे बंद झाले आहे.
हातगाड्यांना
अजूनही मागणी
जवळची मालवाहतूक करण्यासाठी अजून हातगाड्यांना मागणी आहे. सातारा शहरात मजूर अड्ड्यावर काही हातगाडे पाहायला मिळतात. भाजीपाला, नारळाची पोती, गाद्या, टिकाऊ वस्तंूचे बॉक्स, बांधकामाचे स्टील, कपाटे अशा वस्तू दुकानातून घरापर्यंत नेण्यासाठी हातगाड्यांचा वापर होताना दिसतो. तसेच गोडावूनमधील माल दुकानापर्यंत नेण्यासाठीही हातगाडी वापरली जाते. कमी पैशात ही वाहतूक होत असल्याने आजही त्याला मागणी आहे.