भाजप सत्तेत राहिल्यास शेतकरी उद्ध्वस्त..

By admin | Published: March 13, 2017 10:56 PM2017-03-13T22:56:11+5:302017-03-13T22:56:11+5:30

पृथ्वीराज चव्हाण : आर्वी येथे काँग्रेस कार्यकर्ता मेळावा; विजयी सदस्यांचा सत्कार सोहळा

Farmers devastated if BJP stays in power .. | भाजप सत्तेत राहिल्यास शेतकरी उद्ध्वस्त..

भाजप सत्तेत राहिल्यास शेतकरी उद्ध्वस्त..

Next



रहिमतपूर : ‘निवडणूक जिंकण्यासाठी पंतप्रधान मोदींनी उत्तर प्रदेशमध्ये कर्जमाफीची घोषणा केली होती. मग महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी काय पाप केलं म्हणून त्यांना कर्जमाफी दिली जात नाही. शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय न घेणारे हे सरकार उद्योगपती व बिल्डरधार्जिणे आहे. या सरकारला असेच सत्तेत ठेवल्यास शेतकरी उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही,’ असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
आर्वी, ता. कोरेगाव येथे नवनिर्वाचित विधानपरिषद सदस्य, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, नगरपालिका व नगरपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांचा विजयी सत्कार सोहळा व कऱ्हाड उत्तर विधानसभा मतदार कार्यकर्ता मेळाव्यात चव्हाण बोलत होते. यावेळी माजी वनमंत्री डॉ. पतंगराव कदम, आमदार जयकुमार गोरे, आ. मोहनराव कदम, धैर्यशील कदम, कोरेगाव तालुकाध्यक्ष किशोर बाचल, कऱ्हाड मार्केट कमिटीचे सभापती हिंदुराव चव्हाण, किरण बर्गे, संपतराव माने, जिल्हा परिषद सदस्य भीमराव पाटील आदी उपस्थित होते.
माजी मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले, ‘सरकारला ग्रामीण अर्थव्यवस्था समजलेली नाही. शेतीमालाला किफायतशीर दर दिल्याशिवाय शेतकऱ्यांचे जीवन सुसह्य होणार नाही. काँग्रेस सरकारने आपल्या कार्यकाळात शेतकऱ्यांची ७२ हजार कोटींची कर्ज माफ केली होती. महाराष्ट्र सरकारने ६ हजार कोटींचे कर्ज माफ केले होते. भाजप सरकारला कर्ज माफ करायला काय अडचण आहे. भाजप सरकारच्या काळात महाराष्ट्रात सर्वात जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. काँग्रेसच्या वेगवेगळ्या योजना नाव बदलून राबवूनही दुष्काळ हटवण्यात सरकारला अपयश आले आहे.’
भीमराव पाटील सत्काराला उत्तर देताना म्हणाले, ‘वाठार किरोली गटातील जनतेने निवडणूक हातात घेऊन काँग्रेसच्या उमेदवारांना विजयी केले. पृथ्वीराज चव्हाण, आ. जयकुमार गोरे यांनी दिलेला निधी मतदार संघात खर्च केला आहे. त्यामुळे जनतेची साथ मिळाली. कुणी काहीही म्हणाले तरी नेहमी पक्ष वाढीसाठी प्रयत्न करणार आहे. रहिमतपूरमधील ज्येष्ठ नेते पक्षाला ताप देत असून, त्याच्याबाबत योग्य तो निर्णय घेण्यात यावा.’
पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते जिल्हा परिषद सदस्य भीमराव पाटील, निवास थोरात, सुनीता कदम आदी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्यांचे सत्कार करण्यात आले.
यावेळी धैर्यशील कदम, प्रकाश पाटील, विकास राऊत आदींनी मनोगत व्यक्त केले. दीपक साबळे यांनी सूचसंचालन केले. विकास राऊत यांनी आभार मानले. (वार्ताहर)
सत्तेचा होतोय दुरुपयोग...
निवडणुकीमध्ये तत्व, त्याग, धोरण व विकासाचा काहीही संबंध न ठेवता भाजपा सरकारने फक्त सत्ता व संपत्तीचा प्रचंड मोठा दुरुपयोग करून कसल्याही परिस्थितीत निवडणूक जिंकायचीच असे धोरण राबवले. त्यामुळे जिल्ह्यात काही ठिकाणी तिरंगी लढती झाल्या. नाहीतर आपली लढाई राष्ट्रवादीबरोबर आहे. सत्ताधाऱ्यांनी आपले उमेदवार व कार्यकर्ते फोडण्यासाठी आमिषे दाखवली. आमिषाला बळी नाही पडली त्यांना आमच्याकडे या नाहीतर तुमच्या केस बाहेर काढून चौकशी लावू, अशा धमक्या दिल्या. असा सत्तेचा दुरुपयोग सुरू असल्याचा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.
पुरुन उरल्याशिवाय राहणार नाही : गोरे
आमदार जयकुमार गोरे म्हणाले, ‘जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेसला वातावरण चांगले होते. मात्र, मतदानाच्या अगोदर तीन दिवसांत गणित फिरले नाहीतर जिल्हा परिषदेला २०-२२ सदस्य काँग्रेसचे असते. पक्षात राहून पक्षविरोधी काम करणाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे. काँग्रेसचा पराभव कुणीही करू शकत नाही. परंतु गद्दारी करणाऱ्यांमुळे पराभव होत असून, हे थांबले पाहिजे. बाबा तुम्ही याबाबत लवकर निर्णय घ्या. पक्षाबरोबर राहणाऱ्यांना नीटनेटके करा. पक्षवाढीसाठी जिल्हाभर पळतो म्हणून मला वेगवेगळ्या प्रकरणात अडवले जातेय; पण राजकारणात येतानाच मी सर्व सामग्री घेऊन आलोय. त्यामुळे ‘सर्वांना पुरुन उरुन यांना गाडल्याशिवाय मी थांबणार नाय,’ असा टोलाही आ. गोरे यांनी हाणला.

Web Title: Farmers devastated if BJP stays in power ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.