शेतकऱ्यांनी ८० मिलिमीटरवर पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये; कृषी विभागाचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:28 AM2021-06-03T04:28:11+5:302021-06-03T04:28:11+5:30
सातारा : येत्या दोन दिवसांत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह पाऊस ...
सातारा : येत्या दोन दिवसांत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. शेतकऱ्यांनी ८० ते १०० मिलिमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सोयाबीन, बाजरी, भुईमूग व मका या पीक पेरणीपूर्व तयारीची कामे करावीत. भात पिकासाठी रोपवाटिकेची पूर्वतयारी सुरू ठेवावी. खरीप हंगामातील सोयाबीन या पिकासाठी जमिनीच्या प्रकारानुसार पूर्व मशागतीची कामे करावीत. सोयाबीन, बाजरी, उडीद, मूग, मका या खरीप पीक पेरणीसाठी शेतजमीन नांगरणी व वाखराच्या पाळ्या देऊन तयार करावी.
जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी किमान ८० ते १०० मिलिमीटर इतका पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये. अपुऱ्या ओलीवर पेरणी केल्यानंतर पावसाचा खंड झाल्यास पेरणी वाया जाऊ शकते. ८० ते १०० मिलिमीटर पाऊस झाल्यास पुरेशा खोलीवर ओल जाते. तसेच पावसाचा खंड पडल्यास पीक तग धरू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, असे आवाहनही राज्य शासन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.
.........................................................................