सरकारची काटकसर; पूरक पोषण आहारात तेलाऐवजी साखर...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:27 AM2021-06-03T04:27:31+5:302021-06-03T04:27:31+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : लहान मुले, गरोदर महिला, स्तनदा माता यांचे पोषण उत्तम प्रकारे व्हावे, भविष्यामध्ये आरोग्याच्या संदर्भाने ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : लहान मुले, गरोदर महिला, स्तनदा माता यांचे पोषण उत्तम प्रकारे व्हावे, भविष्यामध्ये आरोग्याच्या संदर्भाने त्यांना कोणतीही समस्या निर्माण होऊ नये म्हणून बाल विकास विभागाच्या माध्यमातून पूरक पोषण आहार योजना लागू केली आहे. मात्र, अनेक ठिकाणी या योजनेमध्ये तेल मिळते तिथे साखर नाही आणि साखर दिली तर तेल दिले जात नाही, अशी परिस्थिती आहे.
जिल्हा परिषदेच्या वतीने या योजनेतील लाभार्थींना पोषण आहार मिळावा, यासाठी नियोजन केले जाते. प्रत्येक गावामध्ये अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून या आहाराचे वितरण करण्यात येते. मात्र, कोरोनाच्या लाटेमध्ये या योजनेच्या माध्यमातून लाभ मिळत नसल्याच्या तक्रारी येत आहेत. पोषण आहारातील सर्व वस्तू मिळणे अपेक्षित असताना अनेक वस्तू मिळत नाहीत. तसेच कर्मचारी गावांमध्ये फिरकत देखील नाहीत, अशा तक्रारी मोठ्या प्रमाणावर आहेत.
पूरक पोषण आहार योजनेचे एकूण लाभार्थी : २०१६१२
सहा महिने ते तीन वर्षे वयोगटातील लाभार्थी : ७६३६८
गरोदर महिला लाभार्थी : १३८६४
स्तनदा माता : १४०७७
फोडणी कशी द्यायची?
कोट..
पूरक पोषण आहारामध्ये तेल मिळत नसल्यामुळे कोरडी भाजी करायची वेळ आलेली आहे. तेल नसल्यामुळे भाजी चविष्ट होत नाही आणि मुलेही खात नसल्यामुळे त्यांचे पोषण होत नाही.
- सुरेखा बाबर
कोट...
शासनाच्या योजनेतून मिळत असलेले पूरक पोषण आहार प्रत्येकालाच मिळेल, अशी खात्री राहिली नाही. आमच्याकडे डोंगरी भागात तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणी फिरकले देखील नाही.
- मनीषा सूर्यवंशी
कोट..
पोषण आहार द्यायला महिला कर्मचारी फिरकत देखील नाहीत. आताच्या लॉकडाऊमध्ये खरेतर सर्वच कुटुंबांना पोषण आहाराची गरज होती. दुर्गम भागात मात्र पुरते दुर्लक्ष झालेले दिसते.
- मच्छिंद्र साळुंखे
अधिकारी कोट
पूरक पोषण आहारामध्ये शासनातर्फे ज्या वस्तू मंजूर आहेत, त्या मिळतात. अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून कोविडच्या साथीत देखील आम्ही घरपोच हे साहित्य पोहोचवतो आहे. ट्रान्सपोर्टचा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, तो आता सुटला आहे.
- मनोज ससे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी बालविकास
काय काय मिळते आहारात?
१ या आहारामध्ये गहू, तांदूळ, तेल, साखर, मीठ, तिखट, डाळी, कडधान्य या वस्तूंचा अंतर्भाव आहे. शासनाच्या वतीने यासाठी निधी दिला जातो.
२ हे साहित्य लाभार्थींपर्यंत पोहोचले तर मुलांचे कुपोषण राहणार नाही. तीन महिने ते सहा वर्षांपर्यंत मुलांना हा पोषक आहार मिळणे अत्यंत आवश्यक आहे.
३ गरोदर महिला तसेच स्तनदा मातांना देखील या आहाराची नितांत आवश्यकता आहे. लॉकडाऊनच्या काळामध्ये किराणा साहित्याची दुकाने बंद असल्याने या महिलांना पूरक पोषण मिळत नाही.