जिल्ह्यात मान्सूनची चाहूल;
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:28 AM2021-05-31T04:28:16+5:302021-05-31T04:28:16+5:30
बळीराजाची पेरणीची तयारी : बियाणांची जुळवाजुळव सुरू लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : जिल्ह्यात दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण होत असून, ...
बळीराजाची पेरणीची तयारी : बियाणांची जुळवाजुळव सुरू
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : जिल्ह्यात दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण होत असून, काहीवेळा पाऊसही होत आहे. यामुळे सातारावासीयांना मान्सूनची चाहूल लागली आहे. त्यातच पाऊस लवकर दाखल होण्याच्या शक्यतेने बळीराजाने खरीप हंगाम पेरणीची तयारी सुरू केली आहे. अनेक शेतकऱ्यांकडून बियाणांची जुळवाजुळवही सुरू आहे.
जिल्ह्यात खरीप हंगाम मोठ्या प्रमाणात घेण्यात येतो. जिल्ह्याचे खरीप क्षेत्र सर्वसाधारणपणे साडेतीन लाख हेक्टरच्या पुढे आहे. यामध्ये सर्वच ११ तालुक्यांत विविध पिके घेण्यात येतात. जिल्ह्यात सोयाबीनचे सर्वसाधारण क्षेत्र हे ६० हजार हेक्टरच्या पुढे असते. यानंतर बाजरी, भात या पिकांचा समावेश होतो. तसेच भुईमूग, कडधान्येही काही प्रमाणात घेण्यात येतात. यावर्षीही मान्सूनचा पाऊस वेळेत दाखल होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
जिल्ह्यात साधारणपणे १० जूनच्या आसपास मान्सूनचा पाऊस दाखल होतो. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील वातावरणात कमालीचा बदल झाला आहे. कमाल तापमानात उतार आला असून, थंड वारे वाहत आहेत. त्यातच दोन दिवसांपासून काही ठिकाणी पाऊस झाला. शनिवारी सायंकाळच्या सुमारास साताऱ्यात पावसाने जोरदार हजेरी लावली, तर रविवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होते. दुपारी ऊन पडले. सध्या जिल्ह्यात पावसाळी वातावरण तयार झाले असल्याने सर्वांनाच मान्सूनची चाहूल लागली आहे. शेतकऱ्यांनीही खरीप हंगाम पेरणीची तयारी सुरू केली आहे.
.........................................................