महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना मान्सूनपूर्व कामांचा विसर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:27 AM2021-06-03T04:27:58+5:302021-06-03T04:27:58+5:30
रामापूर : पाटण शहरातील वीजखांबांशेजारी व वाहिनीला अडथळा ठरणारी झाडे, झुडपे आणि वेली काढण्याच्या मान्सूनपूर्व कामाचा महावितरणच्या कर्मचाऱ्यांना विसर ...
रामापूर : पाटण शहरातील वीजखांबांशेजारी व वाहिनीला अडथळा ठरणारी झाडे, झुडपे आणि वेली काढण्याच्या मान्सूनपूर्व कामाचा महावितरणच्या कर्मचाऱ्यांना विसर पडल्याचे दिसत आहे.
पाटण तालुक्यात आणि शहरात गेल्या काही दिवसांपासून सायंकाळी वाऱ्यासह पाऊस पडत आहे. शहरात काही ठिकाणी वीजवाहक तारांजवळ असणाऱ्या झाडाच्या फांद्या घासत असून, पाऊस सुरू झाल्यावर तारा एकमेकांना चिटकून वीज खंडित होत आहे. यामुळे घरातील विजेची उपकरणे नादुरुस्त होत आहेत.
वीजवाहक तारा अनेक ठिकाणी खाली आलेल्या असल्याचे सांगूनदेखील त्याची योग्य दखल महावितरणकडून घेतली जात नाही. तालुक्यात आणि परिसरातील अनेक मुक्या जनावरांचे जीव महावितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे गेले आहेत. याबरोबरच वीजवाहक तार ऊस किंवा पिकांमध्ये तुटून पडल्यानेही अपघात झाले होते. मात्र, यातून महावितरण कंपनीचे अधिकारी आणि कर्मचारी कधी बोध घेणार आहेत, असा प्रश्न वीज ग्राहकांमधून विचारला जात आहे.
तालुक्यात अनेक ठिकाणी विजेच्या तारा लोंबकळलेल्या अवस्थेत आहेत. तसेच विद्युत डीपीवर साधा पत्रादेखील लावण्याचे औदार्य महावितरण कंपनी दाखवत नाही. वीजवाहक तारांवर आलेल्या झाडांच्या फांद्यादेखील पावसाळा सुरू होण्यापूर्वी तोडणे आवश्यक आहे. जेणेकरून पावसाळ्यामध्ये घर्षण होऊन वारंवार वीज वाहक तार तुटून वीज पुरवठा खंडित होऊन त्याठिकाणी कोणताही अनूचित प्रकार होणार नाही. तालुक्यातील पाटण शहर, मोरणा, कोयना, केरा, मरळी विभागात बरेच डीपी उघडे आहेत. यासंदर्भात अधिकाऱ्यांना विचारले असता, दरवाजे आले की ते बसविण्यात येतील, अशी उत्तरे देण्यात येतात. तालुक्यातील आणि पाटण शहरातील या सर्व बाबी महावितरण कंपनीने गांभीर्याने घेऊन सर्व विभागात मान्सूनपूर्व कामे करावीत, अशी मागणी तालुक्यातील आणि शहरातील वीज ग्राहकांनी केली आहे.