मुंबईकर बाधित झाले पण;
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:28 AM2021-06-02T04:28:59+5:302021-06-02T04:28:59+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : कोरोनाच्या पहिल्या लाटेत सुरक्षित असलेला ग्रामीण भाग दुसऱ्या लाटेत मात्र असुरक्षित असल्याचे सध्या दिसून ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : कोरोनाच्या पहिल्या लाटेत सुरक्षित असलेला ग्रामीण भाग दुसऱ्या लाटेत मात्र असुरक्षित असल्याचे सध्या दिसून येत आहे. याचे कारण म्हणजे मुंबई-पुण्याहून लक्झरी बस अक्षरश: प्रवाशांनी तुडुंब भरून रातोरात ग्रामीण भागात येऊ लागल्या आहेत. यातील एकाही प्रवाशाची प्रशासनाकडे नोंद नाही ना त्याची चाचणी केली गेली. त्यामुळे मुंबई- पुण्याहून आलेले प्रवासी बाधित असूनही त्याची आकडेवारी मात्र वेगळी प्रशासनाकडे नसल्यामुळे साराच सावळा गोंधळ आहे.
सातारा जिल्ह्यातील ग्रामीण भागांमध्ये सध्या मुंबईहून लक्झरी बस गावी येत आहेत. विशेष म्हणजे मुंबईपासून गावी येईपर्यंत त्यांना वाटेत कोणी कसे काय, ई पास मागत नाही की, तुम्हाला परवानगी आहे का, याची विचारणा करत नाही. याचे आश्चर्य गावकऱ्यांमधून व्यक्त होत आहे. काही मुंबईकर अगोदरच कोरोनाबाधित असतात. गावी आल्यानंतर ते इकडून तिकडे फिरत असतात. त्यामुळे संसर्ग अधिकच फैलावत आहे. गावातील कोणी त्यांना बोलले तर वादावादीचे प्रसंग उद्भवतात. त्यामुळे त्यांना कोणीही बोलत नाही. गाव पातळीवरील समितीही काही ठिकाणी तोंड पाहून कोरोनाची जनजागृती करत असतात. जिल्ह्यातील ग्रामीण भागांमध्ये सध्या ७८९० रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यामध्ये स्थानिक किती आणि मुंबई पुण्याहून आलेले किती अशी वर्गवारी प्रशासनाने केली नाही. त्यामुळे साराच गोंधळ आहे. आता रात्रीचा पोलीस बंदोबस्त जिल्ह्याच्या सीमेवर वाढवण्यात आला आहे.
गतवर्षी ग्रामीण भागामध्ये कोरोना फारसा नव्हता. यावर्षी कोरोनाची लागण केवळ पुणे- मुंबईहून आलेल्या प्रवाशांमुळे झाली आहे. त्यांना गतवर्षीसारखे विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले नव्हते. याचे गंभीर परिणाम आपल्या लोकांना भोगावे लागत असल्याचे उत्तम वाघ (रा. तारळे) यांनी सांगितले.
गतवर्षी गावामध्ये आडवे बांबू लावून वाहतूक अडवण्यात आली होती; पण यंदा असे काहीच करण्यात आले नाही. त्यामुळे पुणे मुंबईहून येणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त होती, असे संदीप साळुंखे (रा. कडवे बुद्रुक, ता. पाटण) यांनी सांगितले.
आम्ही मुंबईहून येताना कोरोना चाचणी केली होती. त्यामुळे आम्ही गावी आलो आहोत (रा. कडवे बुद्रुक) असे सुधीर कदम सांगतात. तर नागठाणे येथील सर्जेराव माने यांनी सांगितले की, मुंबईहून गावी येणाऱ्या प्रत्येक नागरिकांनी कोरोना चाचणी केली पाहिजे. आपण जर चाचणी केली नाही तर घरातील लोकांचा जीव आपण धोक्यात घालत आहोत, हे लक्षात ठेवले पाहिजे.